/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */

Romance डॉलर बहू

adeswal
Expert Member
Posts: 3283
Joined: Sat Aug 18, 2018 4:09 pm

Re: Romance डॉलर बहू

Post by adeswal »

दिवसांमागून दिवस गेले, महिनेही गेले तरी विनितेकडून उत्तर आलं नाही. चंद्रूला काळजी वाटू लागली- पत्र आणखी कुणाच्या तरी हाती पडलं नसेल ना? अमेरिकेत काही वर्षं राहिल्यामुळे आपला अशा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन मोकळा असतो. धारवाडच्या माळमड्डीवर राहणाऱ्यांची दृष्टी वेगळी असते.
चंद्रूला स्वत:च्या अविचारीपणाचा राग आला.
अखेर एक दिवस पाकीट आलं. त्यानं लिहिलेलं पत्रच माघारी येऊन त्याला पोहोचलं होतं. पत्त्यावर ही व्यक्ती राहत नसल्याच्या शेऱ्यासहित पत्र आलं होतं.
आपलं पत्र आणखी कुणाच्या हातात पडलं नाही म्हणून सुस्कारा सोडत असतानाच चंद्रू गोंधळून गेला. कुठे गेली विनिता?
मनात पालवलेल्या आशा-आकांक्षा आणि गुपिताच्या त्या पत्रासोबत चिंध्या करून चंद्रूनं त्या कचऱ्याच्या टोपलीत टाकल्या. त्याचं मन निराशेनं भरून गेलं. आंब्याचं मोहोरलेलं झाड कोकिळेच्या कूजनाची आतुरतेनं वाट पाहत होतं- पण कोकिळा वेगळ्याच वृक्षावरच्या घरट्यात शिरली होती.
गौरम्मांनी शामण्णांना स्पष्टपणे सांगितलं होतं,
`अहो, बेंगळूरमध्ये घर असतं तर गोष्ट वेगळी! धारवाडमधलं घर घेऊन काय करायचं? आपल्याला काय उपयोग धारवाडमधल्या घराचा? आपल्या घरचं हे पहिलं लग्न आहे. त्यासाठी परगावचे भरपूर नातेवाईक जमतील. सगळे विचारतील- मुलीकडच्यांनी काय काय दिलं? त्यांना म्हणावं, आमच्या गावात तीन दिवसांसाठी एक चांगलं कार्यालय धरा आणि छान लग्न करून द्या. आपल्याला हुंडा मुळीच नको. म्हणावं, सालंकृत कन्यादान करून द्या. त्यांच्याच मुलीला सोनं घालू द्या. आम्हांला काही नको. लग्नाला माणसं येतील त्यांना जेवण आणि खाणं-पिणं मात्र उत्तम करा म्हणावं. ती माणसं काय पुन्हा-पुन्हा आपल्या घरी येणार आहेत? नंतर एक उत्तम रिसेप्शन करून द्या म्हणजे झालं!’
`गौरी, आपण यात लक्ष घालू नये. विनिता आणि गिरीशलाच घराच्या संदर्भात जे ठरवायचं ते ठरवू द्या. स्वत:च्या मालकीचं घर विकून गावभरच्या नातेवाईकांकडून शाबासकी मिळण्यात काय अर्थ आहे? माझं मत असं आहे!’ शामण्णांनी सांगितलं.
गिरीशनं आई-वडिलांची मतं ऐकून घेतली. विनिताशी बोलल्यानंतरच धारवाडच्या घरासंदर्भातला निर्णय घ्यायचा, हे त्याचं पक्कं ठरलं होतं.
लग्न ठरल्याच्या आनंदापेक्षा धारवाडचं घर विकण्याच्या विचारानं विनिता दग्ध झाली होती. पण मनातला दाह कुणापुढे व्यक्त करणार? घर जुनं होतं, काही ठिकाणी पडझडही झाली होती; पण ते घर म्हणजे तिच्या लहानपणी मृत्यू पावलेल्या आईची आठवण होती. आता तिचं असं या जगात केवळ ते एक घरच होतं. तिचं बालपण त्या घरात गेलं होतं. रात्रीच्या काळोखातही ती कुठलं झाड कुठं आहे हे दाखवू शकत होती.
झाडा-वृक्षांच्या सान्निध्यात वाढलेल्या विनिताच्या मनात दु:ख-वेदना ठसठसू लागली की, याच झाडा-वृक्षांच्या सान्निध्यात तिचा निचरा होऊन विनिता पुन्हा आनंदित होत असे. ती बाग- तो निसर्ग तिच्या दृष्टीनं केवळ स्थावर मालमत्ता नव्हती, तोच तिचा सखा-सांगाती होता. घरात भरपूर कामाचं ओझं असलं तरी झाडांच्या आणि सुरांच्या सावलीत तिला कष्टाचाच नव्हे; साऱ्या जगाचाच विसर पडत होता.
केवळ तीन दिवसांच्या उत्सवासाठी असलं जिवाभावाचं घर आणि बाग विकून टाकणं हा विचारच तिला अत्यंत हिंस्त्र वाटत होता. बाग आणि घर विकून आलेल्या पैशांमधून सोनं-नाणं, रेशमी साड्या, चांदीची भांडी घ्यायची- त्या साड्यानी आपला देह झाकायचा- तिला सारंच असह्य होत होतं.
पण तिला कुणीही `या संदर्भात तुला काय वाटतं?’ असं विचारलं नव्हतं. शिवाय ते व्यवहार्यही नव्हतं. धारवाडचं घर विकल्याशिवाय लग्न होणंच शक्य नव्हतं. त्यामुळे आता तिच्यापुढे केवळ दोनच पर्याय होते- लग्न की घर? मन काहीही म्हणत असलं तरी तिला घरावरचा मोह सारावा लागणार, हे तिलाही समजत होतं.
घशाशी आलेला आवंढा गिळत विनिता बसमधून उतरली. समोर गिरीश होता. तिनं पटकन डोळे टिपले; पण गिरीशच्या तीक्ष्ण नजरेनं हे जाणलं होतं.
`विनिता, थोडं काम आहे. रजा टाकून येणार का?’
`हं-’ म्हणत तिनं मान डोलावली आणि ती गिरीशबरोबर चालू लागली.
पावलं गिरीशबरोबर पडत असली तरी, विनितेच्या मनात अनेक आशंका उमटत होत्या. याआधी ती कधीच एखद्या तरुणाबरोबर अशी फिरायला बाहेर पडली नव्हती. तरीही मनाच्या कोपऱ्यात एक आशा डोकावत होती- आपला पती होणाऱ्या या तरुणाला आपण आपल्या मनातली भावना बोलून दाखवली तर घर विकणं टाळता येईल का?
लालबागमध्ये सकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे कोवळ्या प्रेमिकांची वर्दळ होती. एका चाफ्याच्या वृक्षाखाली असलेल्या दगडी बाकाच्या टोकावर बसत विनितेनं विचारलं, `काय बरं? कशाला बोलावलंत मला?’
`थोडं काम होतं? तुमच्या धारवाडच्या घराच्या संदर्भात थोडं बोलायचं होतं.’
विनितेच्या हृदयाची धडधड वाढली.
गिरीश पुढं म्हणाला, `धारवाडचं घर विकून लग्न करायला माझा विरोध आहे, हेच तुम्हांला सांगायचं होतं! तुमचं या बाबतीत काय मत आहे?’
मस्तकावर मध्यान्हीचा सूर्य तळपत असताना हजारो कारंजी एकाच क्षणी सर्व बाजूंनी उसळावीत तसा विनितेला अनुभव आला. सुकून निष्प्राण झालेल्या वेलीवर अमृत-सिंचन व्हावं तशी ती डवरून आली.
गिरीश पुढं म्हणाला, `आजच्या दिवसांत एक घर बांधणं किती कठीण आहे, हे मला ठाऊक आहे! आमचं छोटं घर आहे. माडीवरच्या दोन खोल्या बांधण्यासाठी आम्ही वीस वर्षं धडपडत होतो तरी जमत नव्हतं. आता आमचा थोरला भाऊच अमेरिकेत असतो. तो तिथं डॉलर्स वाचवून आम्हांला पाठवून देतोय. म्हणून आम्ही माडीवरच्या खोल्यांचं बांधकाम काढलं आहे. केवळ दोन खोल्या वाढवायला दोन लाखांपेक्षा जास्त खर्च आला आहे.’
विनिता मूकपणे गिरीशचं बोलणं ऐकत होती.
`दोन दिवसांसाठी सगळे पाहुणे जमतील; `लाडू उत्तम होते, अमुक छान होतं, तमुक रुचकर होतं’ म्हणत निघून जातील; पण एकदा हातातून गेलेलं घर पुन्हा मिळणार आहे काय?’
आता तीही म्हणाली, `मलाही तसंच वाटत होतं. पण तुम्ही काय म्हणाल म्हणून काही बोलले नाही.’
तिच्या आवाजातला आनंद लपत नव्हता. चेहराही समाधानानं फुलला होता.
`विनिता, आपण राघवेंद्रस्वामींच्या मठात अगदी साधेपणानं लग्न करू या. मी तुला एक साडी आणि मंगळसूत्र एवढंच देईन. एक वेळ जेवण देऊ या. या सगळ्या नातेवाईकांना थेट मठात बोलवायचं आणि तिथून परस्पर निरोप द्यायचा. माझा सगळा पगार मिळून साडेतीन हजार रुपये आहे. आईच्या हातात दोन सोन्याच्या बांगड्या आहेत आणि घर. एवढीच आमची संपत्ती. याशिवाय आणखीही एक मूल्यवान ऐवज तुझ्याकडे असेल!’
`तो कोणता?’ विनिता बुचकळ्यात पडली.
`मी!’
`त्या बाबतीत माझ्याइतकी श्रीमंत मीच!’ विनिता लाजून; पण मनापासून म्हणाली.
`गिरीशचं लग्न ठरलंय. तुला त्यासाठी इथं आलंच पाहिजे. केव्हा जमेल ते कळव. म्हणजे तसा मुहूर्त ठरवता येईल.
तू घरातला थोरला मुलगा! खरं पाहता आधी तुझं लग्न व्हायला पाहिजे. तू कळवलंस म्हणून आधी गिरीशचं लग्न ठरवलं आहे एवढंच.
मुलगी तुझ्या वडिलांच्या शाळेत नोकरी करते. पेन्शनर झाल्यानंतर तू पाठवलेल्या पैशांमधून माडीवरच्या दोन खोल्यांच्या बांधकामावर तुझे वडील लक्ष ठेवत आहेत. चंद्रू, तू नसतास तर आमचे हे दिवस कसे गेले असते, या विचारानंही मन घाबरं होतं!’
आईचं विस्तृत पत्र वाचून चंद्रूला आनंद झाला. पत्रात गिरीशच्या बायको होणाऱ्या मुलीचं नाव लिहायचं राहून गेलं होतं. गिरीश किंवा शामण्णांना पत्र लिहायची सवय नव्हती. त्यामुळे आईच्या पत्रातून जेवढं समजत होतं तेवढंच.
आईनं भरपूर आग्रहानं लिहिलं असलं तरी, आता भारतात जाण्यात शहाणपणा नाही, हे चंद्रूला समजत होतं. भावाच्या लग्नाचं कौतुक म्हणून भारतात गेलेल्या वेळीच जर ग्रीनकार्ड मिळण्याची संधी हुकली तर आपल्यावर कायमचे अविवाहित राहण्याची पाळी येईल! तीन वर्षं इथल्या जीवनाची सवय झाली आहे. संधी हुकली तर पुन्हा बेंगळूरमधल्या त्या खुराड्यासारख्या घरात गर्दी करून दाटीवाटीनं आयुष्यभर राहावं लागेल.
त्याऐवजी आता लग्नासाठी म्हणून शंभर डॉलर पाठवले तर त्यांना चार हजार रुपये मिळतील. काहीतरी खर्च करून खूष होतील.
पण आता विनिता कुठं असेल? तिची साथ ज्याला लाभेल तो मात्र खरोखरच नशिबवान म्हटला पाहिजे. तो दररोज तिची सुरेल गाणी ऐकू शकेल! तिच्यासारखी मुलगी दिवा घेऊन शोधत फिरलं तरी दुसरी सापडणार नाही! त्यासाठीही नशीब हवं ना!
चंद्रूनं सुस्कारा सोडला.
सासरी विनितेचे दिवस आनंदात चालले होते. तिच्यावर पित्याप्रमाणे वात्सल्याचा वर्षाव करणारे सासरे तिची मुलीप्रमाणे काळजी घेत होते. हृदयात प्रेमाला परमस्थान देणारा पती गिरीश होता!
सासूबार्इंनीही तिला कधी एखाद्या का होईना, कटू शब्दानं दुखवलं नव्हतं; पण त्यांच्या वागण्यात सासऱ्यांइतकी आत्मीयता नव्हती. त्यांचा स्वभावही फारसा बोलका नव्हता. त्यांच्या अंतर्मनात काय दडलंय हे विनितेला संपूर्णपणे कधीच उमजत नव्हतं. त्यांच्या बोलण्यात आणि मनातल्या भावनेत भेद असल्याचा अनुभव अधूनमधून विनितेला येत होता. त्यांच्या बोलण्यात भावनेपेक्षा व्यावहारिक कर्तव्याचा भाग अधिक असे.
हे विनितेच्या लक्षात आलं तरी तिला वाटायचं, इतर सासवांपेक्षा हे कितीतरी चांगलं, नाही का? त्या निदान घालून-पाडून बोलत नाहीत- वाईट वागत नाहीत.
सुरभीच्या वागण्यात अजूनही अल्लडपणा होता. तिला अजूनही फक्त सिनेमा, साड्या, खाणं-पिणं, मैत्रिणींबरोबर फिरणं यातच आनंद वाटत होता. कॉलेज संपवून ती घरातच असली तरी घरातल्या कुठल्याही कामाला ती हात लावत नव्हती. आईही मुलीत आपले पंचप्राण असावेत, अशा प्रकारे मुलीला जपत होती! सुरभी म्हणजे राजकुमारी आहे, तिला कुणीही कुठलंही काम सांगायचंच नाही, हे गृहीतच होतं. चुकून कुणी काही काम सांगितलंच तर त्या म्हणायच्या,
`अय्यो! ती आणखी कितीसे दिवस इथं राहणार आहे? इथं आहे तितके दिवस तिला आरामात असू द्या ना!’
सुरभीच्याच वयाची विनिता पहाटे पाच वाजता उठायची. सुरभी मात्र नऊ वाजता उठायची. त्यानंतरचा सारा वेळ ती टीव्ही पाहण्यात आणि नटण्यामुरडण्यात घालवत असे.
तसं पाहिलं तर त्या घरातही श्रीमंतीचं कुठलंही लक्षण नव्हतं. तरीही विनिता सुखी होती. पतीबरोबर प्रेम आणि जीवनातले अनुभव वाटून घेत तिचा समाधानी जीवनक्रम चालला होता. केवळ पैसा आणि दागदागिन्यांमुळे स्त्री सुखी होते, या भ्रमात ती कधीच नव्हती.
कधी-कधी तिला एका गोष्टीची मात्र खंत वाटत असे. गिरीशच्या स्वभावात कुठलीही खोट नव्हती. त्याच्यामध्ये असलेला संगीतप्रेमाचा अभाव ही एकच गोष्ट विनितेला अधूनमधून खट्टू करत होती; पण ही गोष्ट इतकी छोटी होती की, विनिता कधी त्याचा उच्चारही करत नव्हती.
शामण्णांना मात्र तिच्या संगीत-कलेचं कौतुक होतं. ते दररोज तिच्याकडून दोन-चार गाणी-भजनं ऐकत. त्यांनी तर तिला आणखी संगीत शिकायचाही आग्रह केला होता.
धारवाडमध्ये विनितेचं हिंदुस्थानी संगीतात शिक्षण झालं होतं. बेंगळूमध्ये तसा गुरू भेटणंही कठीणच होतं. शिवाय तिला संगीताकडून आत्मतृप्तीखेरीज आणखी कशाचीच अपेक्षा नव्हती. वसंतबनात गाणाऱ्या कोकिळेला कुठं राजदरबारातल्या उच्च स्थानाची अपेक्षा असते?
अलीकडे तिची नोकरी सरकारी झाली होती. त्यामुळे तिचा पगारही समाधानकारक होता. धारवाडचं घर न विकल्यामुळे तिच्या मनात समाधानाबरोबरच गिरीशविषयी कृतज्ञभावना काठोकाठ भरलेली असे.
गिरीशही नेहमीप्रमाणेच राहात होता. त्यांच्या श्रीमंत नसलेल्या जीवनात समाधान काठोकाठ भरलेलं होतं. दिवस कसे जात होते, ते त्या दोघांनाही कळत नव्हतं.
शशिकला विनितेच्या शाळेतच नोकरी करत होती. त्या दोघींचं पटायचंही खूप. दोघी एकाच वेळी नोकरीला लागल्या होत्या. शशी अजून नोकरीत कायम झाली नव्हती. दोघीही परस्परांची सुख-दु:खे एकमेकींना सांगायच्या.
त्या दिवशी शशी शाळेत आली तेव्हा तिचा चेहरा उल्हासानं फुलला होता. मनातला आनंद लपवण्याचा शशीचा प्रयत्न विफल होत होता.
तिला पाहताच विनितेनं विचारलं, `काय गं? काय बातमी आहे? एवढा कसला आनंद?’
`आत्ता नको! लंच-टाईममध्ये सांगते-’ शशी उद्गारली.
`सांग तर!’
`अंहं- दुपारी पवित्रा हॉटेलला जाऊ या. तिथं सांगेन.’
`पार्टी आहे?’
शशी हसली.
दुपारी लंच-टाइमला दोघी ठरल्याप्रमाणे पवित्रा हॉटेलच्या माडीवर गेल्या.
खुर्चीवर बसल्या-बसल्या विनिता म्हणाली, `शशी, अभिनंदन!’
`विनू, तुला कसं समजलं?’
`तुझा चेहरा बघून!’
शशीचा चेहरा आणखी लाल झाला. ती सांगू लागली,
`आमच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा. शंकर त्याचं नाव.’
`लग्न कधी?’
`आणखी दोन-तीन महिन्यांनंतर होईल असं वाटतं. आजच त्यांचे वडील घरी येऊन गेले. एवढ्यात मुहूर्त नाही.’
`कार्यालय मिळाल्यानंतर लग्न होईल म्हण ना! मुहूर्ताचं काही विशेष नाही!’ विनिता हसत म्हणाली.
`मला नोकरी सोडावी लागेल, विनू!’
`शंकर कुठली नोकरी करतात? काय शिकलेत ते?’
शशीचा चेहरा उतरला. शंकर मैसूरमध्ये राहात होते. एम. एस्सी चौथ्या क्रमांकानं पास होऊनही त्यांना बरी नोकरी मिळाली नव्हती. आता ते तात्पुरती क्लासेसमध्ये शिकवण्याची नोकरी करत होते.
`मग एवढ्यात लग्नाचा का विचार करताहेत?’
`दोन्ही घरांमध्ये खूप वर्षांचे स्नेहसंबंध आहेत. माझी आईच म्हणाली- नोकरीची वाट बघत लग्न पुढं टाकायला नको. मीही नोकरी करून संसाराला हातभार लावू शकेन किंवा दोघं मिळून क्लासेस सुरू करू.’
`हं. तेही खरंच म्हणा! उगाच लग्न का पुढं ढकलायचं? बरं! साखरपुडा कधी?’
`त्यांच्या घरी साखरपुडा करायची पद्धत नाही म्हणे. एकदम लग्नच. विनू, मला मात्र काही वेळा भीती वाटते बघ!’
`भीती कसली?’
`सगळं ठीक होईल ना?’
`होईल गं! सगळं ठीक होईल. माझाच अनुभव सांगते. दोघं मिळून कष्टाची तयारी ठेवा. धैर्य गमावू नका.’
भविष्यात काय दडलंय ते कुणास ठाऊक! तरीही विनिता तिच्या मनाचं धैर्य वाढवत होती.
शशी म्हणाली, `आजच नोकरीचा राजीनामा देते. दोन महिन्यांची नोटीस देणं आवश्यक आहे ना!’
दोघी उठल्या. हिनं आणखी थोडा विचार करून राजीनामा द्यावा, असा विचार करत विनिता तिच्याबरोबर चालू लागली.
अलीकडे शशीनं शाळेला येणं सोडून दिलं होतं. त्यामुळे विनितेला एकटेपणाची भावना जाणवत होती. `शशी सुखी आहे ना, मग झालं तर!’ अशी ती स्वत:ची समजूत काढत होती. आपल्या प्रिय मैत्रिणीच्या लग्नाला काय भेट द्यावी याचा ती विचार करत असतानाच एक दिवस ती बातमी आली.
`विनिता, तुला समजलं? शशीचं लग्न मोडलं!’ शाळेतल्या ज्येष्ठ शिक्षिका सुशीला मॅडमनी तिला विचारलं.
`नाही! मला ठाऊक नाही!’ विनिता बसलेल्या धक्क्यातून स्वत:ला सावरत म्हणाली.
`तुम्ही दोघी एवढ्या मैत्रिणी असूनही काही बोलली नाही ती? फार त्रास झालाय तिला!’
पुढचं बोलणं विनिताच्या कानात शिरलंच नाही. काय झालं असेल? शंकरला अपघात झाला असेल काय? त्याचं वेगळ्या एखाद्या मुलीशी प्रेमप्रकरण असेल काय? पण शशीशी त्याचा अनेक वर्षांचा परिचय होता आणि त्याच्या मर्जीनंच हे लग्न ठरलं होतं. मग का मोडलं असेल लग्न? विनिताच्या जिवाची तडफड झाली.
शाळा सुटल्यावर विनितेनं सरळ शशीच्या घराची वाट पकडली.
दारात विनितेला पाहताच शशीच्या मनावरचा ताबा सुटला. ती हुंदके देऊन रडू लागली.
विनितेनं घरावरून नजर फिरवली. घरभर पदोपदी लग्नाची तयारी दिसत होती. घराची रंग-रंगोटी झाली होती. एका कोपऱ्यात तांदळाची पोती रचलेली दिसत होती.
विनितेला पाहताच शशीची आई म्हणाली, `विनिता, तूच हिची समजूत काढ बाई! शशी थोडं अतीच करतेय. ह्या सगळ्या ऋणानुबंधाच्या गोष्टी असतात. आपलं नशीब तेवढं बलवत्तर हवं. नशिबात नसेल तर काय करायचं? गेले दोन दिवस हिनं अन्नाला स्पर्श केलेला नाही!’
एवढी मोठी घटना घडलेली असताना शाब्दिक वेदांताला काही अर्थ नाही हे विनितेला समजत होतं.
शशीच तिला `इथं नको, चल-’ म्हणत माडीवर घेऊन गेली. माडीवरच्या गच्चीत मंद वारं वाहत होतं. समोर पसरलेल्या अथांग बेंगळूरचे दिवे दिसत होते.
तिथल्या चटईवर बसत विनितेनं विचारलं, `शशी, शंकरची प्रकृती बरी आहे ना?’
शशीच्या डोळ्यांमधले अश्रू अदृश्य होऊन त्यांची जागा संतापानं घेतली.
`त्याला कसली धाड भरलेय? चांगला टोणग्यासारखा माजलाय! त्याच्यामुळे आमचा अपमान झालाय. मला तर जीवनाचाच कंटाळा आला आहे. विश्वासघातकी नराधम मेला!’
`अशी कोड्यात बोलू नकोस बाई! काय झालं ते नीटपणे सांग ना! का मोडलं लग्न?’
भावनावेगानं शशीला बोलणं सुचत नव्हतं.
`सांग ना!’
विनितेनं पुन्हा-पुन्हा म्हटलं तेव्हा ती उद्गारली, `त्यानं स्वत:ला विकलंय!’
`म्हणजे? मला नाही समजलं.’
`आमच्या समाजापैकी बरेच अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यांच्यापैकी एकजण आपल्या वीस वर्षांच्या मुलीला घेऊन इथं आले होते. त्यांनी वृत्तपत्रात जाहिरात दिली- आमच्या मुलीशी जो लग्न करेल, त्याला अमेरिकेला घेऊन जाऊ, म्हणून!’
`शंकर गेला?’
`फक्त शंकरच नव्हेत, कितीतरी सुशिक्षित तरुणांनी ती जाहिरात वाचून अर्ज टाकले होते म्हणे! डॉक्टर, सी. ए., इंजिनिअर कितीतरी उच्चशिक्षित तरुण! शंकरनंही गमतीनं त्यासाठी अर्ज टाकला होता म्हणे. पण त्या मुलीला नेमका हाच आवडला!’
`हे काय गं? एखाद्या नोकरीचा इंटरव्ह्यू झाला हा! मग पुढं काय झालं?’
`मग काय! हाही तयार झाला. त्याला वाटलं, आपल्याला संपूर्ण आयुष्यात पुन्हा कितीही धडपड केली तरी अशी संधी मिळणार नाही. कशाला संधी सोडायची? मला त्यानं क्षमा कर म्हणून पत्र लिहिलं आहे.’
`तू त्याचं नरडं धरायचंस! गप्प का बसलीस?’
`खरं सांगू? ते त्याचं पत्र वाचून मला त्याची किळस आली. एवढ्या वर्षांची ओळख, नातं, भावना-सरळ पायदळी तुडवून डॉलर आणि ग्रीनकार्डसाठी त्या मुलीचे पाय चाटणारा शंकर! छी!’
`त्याचे आई-वडील काय म्हणतात?’
`माझे आई-वडील त्यांना जाऊन भेटले. हा कुठल्या गावाचा विपरीत न्याय? म्हणून विचारलं तर म्हणताहेत- अहो, आमच्या मुलाचं तिकडं उज्ज्वल भविष्य आहे! आम्ही का त्याचं नुकसान करू? तो इथं राहिला तर आमच्यासारखाच दरिद्री राहील. सारं जीवन सरलं तरी एक घर बांधायला जमणार नाही, आमच्या मुलींच्या लग्नाचं कर्जही फेडता येणार नाही. म्हणून आम्हीच त्याला हे लग्न करायला सांगितलंय!
`तूही नोकरी सोडलीस ना!’
`होय. त्यावरही शंकरनं उपाय सुचवलाय. त्यानं सांगितलंय- शशीच्या लग्नाला येईल तेवढा खर्च मी अमेरिकेला गेल्यावर डॉलरच्या रूपात पाठवून देईन म्हणून!’
`म्हणजे काय! डॉलरच देव होऊन बसलाय म्हणायचा!’
`देव की भूत कोण जाणे! पण डॉलरचं मोहिनीरूप असं आहे खरं! माझ्या जीवनाचा मात्र तमाशा होऊन गेला बघ! लग्न मोडलं म्हटल्यावर लोक मुलीतच काहीतरी दोष असेल असं म्हणतात ना! आता मी काय करु?’
विनिताला काय बोलावं ते सुचलं नाही. शशीच पुढं म्हणाली, `हेही जाऊ दे. पण इतकी वर्षं मनात शंकरलाच नवरा मानून मी राहिले. एका दिवसात ती भावना कशी उपटून-निपटून काढून टाकता येईल? अमेरिकेचा मोह आणि डॉलरची आशा यासाठी शंकरनं माझा हकनाक बळी दिला.’
शशीच्या दु:खाला हुंदक्याच्या रूपानं वाट फुटली होती. तिचं सारं शरीर हुंदक्यांनी हिंदकळत होतं.
विनिता असहाय्यपणे तिचा आक्रोश पाहत राहिली.
त्या दिवशी चंद्रू अत्यंत आनंदात होता. त्याला प्रमोशन मिळालं होतं.
अमेरिकेला `लँड ऑफ ऑपॉरच्युनेटीज’ म्हणतात ते खोटं नाही. तुम्ही कुणीही असलात तरी चालेल. बढतीच्या पायऱ्या भराभर चढू शकता. फक्त तेवढी तुमची कुवत हवी. बढतीच्या मार्गत भारताप्रमाणे जाती, कुळ, सिनिऑरिटी, भाषा, राजकारण- यांपैकी कशाचाच अडसर येत नाही. उत्तम काम केलं की, लगोलग बढती मिळते. तसंच, कामाची फळं योग्य प्रकारे देऊ शकलं नाही, तर एका पत्राद्वारे त्याला घरीही पाठवलं जातं!
चंद्रूच्या आनंदाला आणखीही एक कारण होतं. आजच त्याचं ग्रीनकार्ड आलं होतं! संपूर्ण जीवन सार्थकी लागल्याची भावना त्याच्या मनात भरून राहिली होती. आयुष्यात कधीही लक्ष्मी प्रसन्न न झालेल्या शिक्षकाचा तो मुलगा. सारं आयुष्य पैशाच्या चणचणीत गेलेलं. आता तोच चंद्रू अमेरिकेचा अधिकृत नागरिक झाला होता! त्याच्या आजवरच्या साधनेचं हे एक फलित!
आता तो राजरोसपणे भारतात जाऊ शकत होता. तो आता आपल्या माणसांना भेटू शकत होता. हेही त्याच्या आनंदाचं एक कारण होतं.
तो घरी परतला तेव्हा एक जाड पाकीट त्याची वाट पाहत होतं. म्हणजे त्यात बरीच पत्रं असतील. म्हणजे भरपूर बातम्या! कदाचित सुरभीच्या मागण्यांची यादीही असेल.
त्यानं कॉफी-मशीनमधून मनासारखी कॉफी करून घेतली आणि कॉफीचा मग समोर ठेवून सावकाश पाकीट फोडलं.
पाकिटात गिरीशचं पत्र आणि त्यात गुंडाळलेले काही फोटो होते.
`प्रिय चंद्रू,
तू आमच्या लग्नाला हजर राहिला असतास तर फार बरं झालं असतं. लग्न साधेपणानं झालं. आम्हा दोघांनाही भपकेबाज लग्न करायचं नव्हतं.
सोबत आमच्या लग्नातले काही फोटो पाठवत आहे. विनितेची तुझ्याशी ओळख आहे असं ती सांगत होती. तिनं तुला नमस्कार सांगितला आहे.
गिरीश.’
चंद्रूनं फोटो पाहिले आणि तो निश्चल झाला. त्याच्या मनाला भावलेली विनिता, सतत चैतन्यपूर्ण राहणारी विनिता त्याच्या भावाची पत्नी झाली होती. लग्नपत्रिकेत त्यानं विनिता नाव वाचलं होतं, पण असेल कुणीतरी असा विचार करून त्यानं तिकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं.
आता जे घडलं होतं, त्याची त्यानं कल्पनाही केली नव्हती. संपूर्ण धारवाडची वसंतलक्ष्मी विनिता हीच जयनगरमधल्या शाळेत शिकवणारी शिक्षिका निघाली होती! कुठून कुठं जोडला गेला हा संबंध?’
चंद्रूला धक्का बसला होता. त्याचं विनितेवरचं प्रेम एकांगी होतं. शिवाय अव्यक्त प्रेम होतं ते!
आता त्याच विनितेचं लग्न झालं आहे, तेही आणखी कुणाशी नव्हे, आपल्याच भावाशी, आपल्याच घरची ती सून होऊन आली आहे.
चंद्रू उभ्या उभ्या कोसळला. सकाळपासून उल्हास-उत्साहानं नाचणारं त्याचं मन कोलमडून गेलं होतं.
क्षणभरच त्याच्या मनात येऊन गेलं- या ग्रीनकार्डचा मोह नसता तर याआधीच भारतात जाऊन विनितेशी विवाहबद्ध होता आलं असतं.
त्यानं फोटो पाहिले.
विनिता वधूच्या वेषात साधी आणि सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरील मंद हास्य हजार हिऱ्यांच्या तेजापेक्षा अधिक तेजानं झळकत होतं. तिच्या चेहऱ्यावरची तृप्त भावना फोटोतही लपत नव्हती.
केवळ रुपाच्याच बाबतीत नव्हे; तिचा स्वभाव, सुमधुर कंठ, तिचं मृदु अंत:करण- कुठल्याही दृष्टीनं पाहिलं तरी ती कुणाही पुरुषाचं मन वेधून घेणारी होती.
प्रत्येक सासूनं अपेक्षा करावी अशी सून होती ती! चंद्रूनं तिचा सालस आणि लाघवी स्वभाव जवळून पाहिला होता. कितीही कजाग सासू असली तरी तिचं मन जिंकून घेण्याचा नम्रपणा आणि प्रेमळपणा विनितेच्या स्वभावात होता.
तसा स्वभाव नसता तर सावत्र आईच्या कजागपणाचा बाऊ न करता, मनातलं दु:ख, चार-दोन अश्रूंबरोबर बाहेर टाकून पुन्हा `चिक्कव्वा’- धाकटी आई म्हणत ती सांगेल ती कामं करायला पदर खोचून तयार झाली नसती. स्वत: चंद्रूनंच तिथल्या वास्तव्यात असले अनेक प्रसंग पाहिले होते. त्याला तिच्या त्या गुणांचंच आकर्षण वाटलं होतं.
असो! यानंतर आई-वडिलांची चिंता करायचं कारण नाही असं चंद्रूला तीव्रपणे जाणवलं. पोटच्या मुलीपेक्षा अधिक विश्वासानं विनिता घराकडे बघेल यात शंका नाही.
या विचारानं काही क्षण बरं वाटलं तरी, चंद्रूला गिरीशविषयी असूया वाटली. गिरीश आपल्याइतका देखणा नाही, आपल्याइतका त्याला पगार नाही, रसिकतेच्या बाबतीतही तो आपल्यापेक्षा डावा आहे. त्याला गप्पांचं तंत्रही फारसं साधत नाही. तरीही रत्नासारखी बायको त्याला मिळाली ना! सख्खा भाऊ कितीही लाडका असला तरी अशा संदर्भात तो एक वेगळा पुरुषच ना!
मत्सर हा तर माणसाचा मूलभूत स्वभावच असतो ना? त्यामुळे चंद्रूच्या मस्तकात शेकडो विचार भावनांचा गोंधळ उठला त्यात काय नवल? त्याच्या मनात आजवर अनोळखी असलेल्या भाव-भावनांचं मिश्रण झालं होतं.
चंद्रूला पूर्वीच्या मन:स्थितीत स्वत:ला आणायला दोन दिवस लागले.
लग्न ठरल्यावर गिरीशचा थोरला भाऊ अमेरिकेत असल्याचं विनिताला समजलं असलं तरी, तो चंद्रू असेल अशी तिला कल्पना नव्हती.
लग्नानंतर सासरी आल्यावर तिनं थोरल्या दिराचा फोटो पाहिला तेव्हा तिला आश्चर्य वाटलं.
धारवाडला त्यांच्या घरी भाड्यानं राहणारा चंद्रू सभ्य तरुण होता. तिचं गाणं आवडल्याचं स्पष्टपणे सांगायचा- संकोच वाटत असला तरी, त्याच्या दृष्टीतून ते तिच्या लक्षात येत होतं. आपलं गाणं तोही ऐकत आहे, हे तिलाही तेव्हा ठाऊक असायचं. आता तोच तरुण आपला थोरला दीर आहे.
बस्स! तिला चंद्रूविषयी एवढीच भावना होती.
चंद्रूला मनोमन वाटलं- आपण तिला लिहिलेलं पत्र तिच्या किंवा आणखी कुणाच्याही हातात न पडता पुन्हा आपल्याच हातात आलं, हे फार चांगलं झालं. लग्न ठरल्यानंतर किंवा झाल्यानंतर ते तिच्या हातात पडलं असतं तर किती अनर्थ झाला असता! मूर्ख रखवालदारानं म्हाताऱ्या पोस्टमनला पत्ता दिला नाही ते बरंच झालं! नाहीतर बिचाऱ्या विनितेच्या संसारात सुरुवातीपासूनच वादळांना सुरुवात झाली असती!
आज चंद्रू मातृभूमीला परतणार होता. साडेतीन वर्षांनंतर! घरात एखाद्या उत्सवाचं वातावरण भरून राहिलं होतं.
गौरम्मा आणि सुरभी चंद्रूच्या स्वागतासाठी एअरपोर्टला जायला तयार झाल्या होत्या. शामण्णा मात्र म्हणाले, `गावात आलाय तो घरी येणार नाही काय? मी येणार नाही.’
सासूबार्इंचा उत्साह पाहून विनिता म्हणाली, `तुम्ही सगळेजण जाऊन या. भावजींना काय आवडतं ते सांगून जा. मी सगळा स्वयंपाक तयार करून ठेवेन.’
`टोमॅटोचं सार कर, आंबोड्या, रायतं आणि कायरस कर. चंद्रूला फार आवडतं.’
गौरम्मा आणि सुरभीनं नीट केस विंचरले आणि ठेवणीतल्या साड्या नेसून दोघी तयार झाल्या. विनिताची कामाची निष्ठा आणि कामं करण्याची पद्धत त्या दोघींना मनापासून आवडली होती. गौरम्मांच्याही मनात आलं, `चंद्रूलाही एक अशीच बायको मिळाली तर कसलीही काळजी राहणार नाही!’
adeswal
Expert Member
Posts: 3283
Joined: Sat Aug 18, 2018 4:09 pm

Re: Romance डॉलर बहू

Post by adeswal »

विमानातून उतरुन बाहेर येत असलेल्या चंद्रूला पाहताच गौरम्मांना मस्तकावरच्या कडक उन्हाचा विसर पडला आणि भावनावेगानं त्यांचे डोळे पाणावले. त्यांच्याप्रमाणेच परदेशाहून आलेल्या आपल्या माणसांचं स्वागत करायला अनेक माता, पिता, पत्नी, भावंडं, मित्रपरिवार कौतुकानं जमले होते.
गौरम्मा टक लावून चंद्रूकडे पाहात होत्या. तो आणखी गोरा झाल्याचं त्यांना जाणवलं. अंगा-पिंडानंही तो आता भरला होता.
दोन मोठाल्या, जाडजूड बॅगा गिरीश टॅक्सीमधून उतरवून घेत असतानाच चंद्रूनं घरात येऊन वडिलांचे पाय धरले.
नंतर त्याची शोधक नजर स्वयंपाकघराच्या दाराशी उभ्या असलेल्या विनितेवर पडली आणि त्यानं विचारलं, `ओळखलंत की नाही? कशा आहात?’
`छान आहे. तुम्ही कसे आहात?’
विनितेनं बेंगळूरची बोलण्याची ढब आत्मसात केलेली पाहून चंद्रू म्हणाला, `अरे वा! तुम्ही तर आमची भाषा पूर्णपणे आत्मसात केलीय!’
`करायलाच हवी ना! तुमच्या घरचीच झालेय ना मी! तुम्ही धारवाडमध्ये होता, त्याच वेळी मी शिकायला सुरुवात केली होती.’
धारवाडचे दिवस आठवताच क्षणभर चंद्रू विद्ध झाला. पण लगेच त्यानं स्वत:ला सावरलं. आता ती आपल्या धाकट्या भावाची बायको आहे, हे भान जाऊ देता कामा नये.
धारवाडमधल्या विनितेपेक्षा ही विनिता अधिक सुंदर दिसत होती. त्या वेळी तिच्या व्यक्तिमत्त्वात बालिशपणाचा बराच अंश होता. आता त्या अर्धस्फुट कळीचं संपूर्ण उमललेल्या फुलामध्ये रपांतर झालं होतं. त्या वेळी वयाचा अल्लडपणा असला तरी मानसिक स्वास्थ्य आणि मन:शांतीचा अभाव होता. आता तिच्या चेहऱ्यावर मानसिक समाधान प्रसन्नपणे विलसत होतं.
चंद्रूनं इतकं सामान आणलं होतं की, काही विचारता सोय नाही! शाम्पू, सोप, काचेची आकर्षक भांडी, डिनर सेट, केशराच्या डब्या, काजू, बदाम, बेदाणे, कॅमेरा, व्हीसीआर, साड्या, अत्तराच्या बाटल्या, चॉकलेट्स-
मुलानं आणलेलं सामान पाहता-पाहता गौरम्मांना स्वर्गच हाताशी आल्यासारखं वाटत होतं. गरिबीतल्या काटकसरी संसारातून अथांग समुद्राचं दर्शन व्हावं, तसं होऊन त्या दिपून गेल्या होत्या.
चंद्रूनं सांगितलं, `अम्मा, एक साडी तुला, एक सुरभीला आणि विनितेला आणली आहे. बाकीचं सामान कुणाला कसं द्यायचं हे तूच पाहा. मला झोप आलीय. झोपतो मी-’
एवढं सांगून चंद्रू झोपण्यासाठी उठला.
अमेरिकेतून आपल्या मुलानं एवढ्या हौसेनं आणलेलं सामान वाटून टाकणं गौरम्मांच्या स्वभावात बसण्यासारखं नव्हतं. त्यांना ते अशक्य होतं. त्यांनी सारं सामान नीट ठेवून दिलं.
चंद्रू आल्यापासून गौरम्मांनी स्वयंपाकघरात पाऊल ठेवणं सोडून दिलं होतं. विनितेनंही त्यात काही गैर आहे, असं मानलं नाही. बऱ्याच वर्षांनी मुलाची भेट होत आहे, मुलाशी गप्पा मारायच्या असतील- असा विचार करून तिनं दोन्ही वेळच्या स्वयंपाकाची जबाबदारी स्वत:कडे घेतली होती. चंद्रूला भेटायला येणाऱ्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांसाठी ती न कंटाळता कॉफी आणि खाणं करत होती. त्यासाठी तिनं आठवडाभराची रजाच काढली होती. सुरभीला तर कधीच कामं करायची सवय नव्हती. त्यात आता भावानं आणून दिलेल्या नाना प्रसाधनाच्या वस्तू घेऊन ती सतत आरशापुढे बसत होती. नाहीतर भावाबरोबर फिरायला जात होती.
चंद्रूची जेमतेम तीन आठवडे रजा होती. एवढ्यात त्याला ढिगानं आमंत्रणं आली होती! त्यातले बरेचसे वधू-पिते होते. रुपानं देखणा, अमेरिकेत राहणारा, सुशिक्षित, अविवाहित तरुण म्हटल्यावर त्याच्यावर अशा वधू-पित्यांचा डोळा असणं स्वाभाविक होतं म्हणा!
त्याशिवाय जुने कॉलेजमधले वर्गमित्र, क्रिकेट-क्लबमधले मित्र, इस्त्रोमधले जुने सहकर्मचारी यांना भेटायला तोही जाऊन येत होता. अर्थात ऑफिसमध्ये जाऊन बॉसला भेटण्याइतकं नैतिक धैर्य त्याच्यापाशी नव्हतं. आपण आजच्या जगाव्यतिरिक्त काही वेगळं केलेलं नाही असा तो बोलताना आपली बाजू मांडत असला तरी, वर्षभर त्या कंपनीच्या खर्चानं ट्रेनिंग घेतल्यानंतर ती नोकरी सोडून जाणं म्हणजे विश्वासघात आहे, हे त्याच्याही अंतर्मनात त्याला जाणवत होतं. अशा वेळी भारतासारख्या गरीब देशात खितपत पडण्यापेक्षा आपण कसं योग्य केलं, यावरचा त्याचा वाद अधिक तीव्र होत होता.
चंद्रूसाठी गौरम्मांनी अनेक मुली बघून त्यांतली एक फायनल लिस्ट तयार केली होती. त्यात चार मुलींचा समावेश होता. त्या पाहून अखेर चंद्रूनं निर्णय घ्यायचा होता.
या साऱ्या गोंधळात चंद्रू मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दमून गेला होता.
गेल्या तीन वर्षांत त्याच्या काही सवयीही बदलून गेल्या होत्या. साधं नळाचं पाणी प्यायलं किंवा काही बाहेरचं खाल्लं की पोट बिघडत होतं. इथं आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्याचं पोट दुखू लागलं होतं. अशा अवस्थेत तीन मिनिटांमध्ये जीवनाचा जोडीदार निवडण्याचा निर्णय घेणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती.
मोठीच मानसिक जबाबदारी ती!
चंद्रूचा कॉलेजमधला मित्र रविचंद्र आता डॉक्टर झाला होता. त्यानं स्वत:चं क्लिनिक काढलं होतं. जयनगरमध्येच ते असल्याचंही कुणीतरी म्हणालं. पोटदुखीनं बेजार झालेला चंद्रू त्याच्याकडे जायला निघाला.
खूप दिवसांनी भेटलेल्या मित्राला पाहून रवीलाही आनंद झाला.
त्यानं चंद्रूला तपासत विचारलं, `काय मित्रा! कशी आहे अमेरिका?’
`उत्तम आहे की अमेरिका! माझं पोट बरं नाही. लवकर बरं बघू!’
`हं! वधू-परीक्षेच्या निमित्तानं दररोज चार-दोन घरी जाऊन चांगलंचुंगलं खात असशील! आता तुझी पहिली प्रतिकारशक्ती राहिलेली नाही. बाहेरचं साधं पाणी पिऊ नकोस. बिसलरी पी. ह्या गोळ्या घे.’
`बरं निघतो. फी किती?’
`नको. राहू दे रे. डॉलरवाल्याला काय फी सांगायची?’
`तसं नाही हं चालायचं! अमेरिकेत जाऊन मीही भरपूर व्यवहार शिकलोय.’
यावर तो क्षणभर काही बोलला नाही. नंतर म्हणाला, `तू आग्रहच करतो आहेस म्हणून सांगतो. शंभर रुपये.’
`ठीक आहे–’ म्हणत शंभरची नोट त्याच्या हातात देत चंद्रूनं विचारलं, `पुन्हा केव्हा भेट?’
`तुझ्या लग्नाच्या दिवशी! तेही रविवारी असेल तरच यायला जमेल. काही वेळा मलाही वाटतं, उगाच ही मेडिकल लाईन घेतली. मुकाट्यानं इंजिनिअर झालो असतो तर अमेरिकेत सुखानं राहिलो असतो. इथली गर्दी नकोशी झाली आहे!’ नोट खिशात सारत रवी म्हणाला.
मंद हसत चंद्रू तिथून बाहेर पडला. त्याची नोकरी, त्याचं राहण्याचं ठिकाण याविषयी प्रत्येकाला असूया वाटत होती!
आता चंद्रूला भारत रिकवँन विंकल’ सारखा वाटत होता. सगळ्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. लोकांची सगळीकडे गर्दी वाढली होती. कुठंही गेलं तरी गर्दीच गर्दी! सगळीकडे रांगा. लांबच लांब रांगा. रस्ते बिघडून गेलेले. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना दुकानं उभी राहिली होती.
कृष्णप्पा सावकार भरपूर श्रीमंत होते. पैसे कर्जाऊ देणे हाच त्यांचा व्यवसाय होता. त्यांनी अपार पैसा मिळवला होता. घरात तीन गाड्या होत्या. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती.
चंद्रू अमेरिकेतून येण्याआधीच कृष्णप्पांनी गौरम्मांना आपल्या घरी नेऊन आपली मुलगी दाखवली होती.
घरात तांडव करत असलेली धनसंपत्ती नजरेत भरत होती. जणू काही अती चंचल लक्ष्मी पाय मोडल्यामुळे त्यांच्या घरी कायमची वास्तव्यासाठी थांबली होती! गौरम्मांनी आधीच त्यांच्या श्रीमंतीविषयी भरपूर ऐकलं होतं. पण प्रत्यक्ष ती श्रीमंती पाहताना मात्र त्यांचा जीव घाबरा झाला. त्यांना वाटलं, जगात खरोखरच एवढी श्रीमंत माणसं असतात तर!
घरभर फक्त चांदीची भांडी दिसत होती. देवाचा देव्हारा चांदीचा होता. देव्हाऱ्याचा कळस आणि खांब सोन्यानं मढवलेले होते. एक ना दोन!
अशा घरातली मुलगी जमुना.
सर्वसाधारण रुपाची. पण अत्यंत विनयशील! गौरम्मांच्या पायांना स्पर्श करून तिनं नमस्कार केला. सुरभीशीही ती मोठ्या स्नेहानं गप्पा मारत होती.
जमुनेच्या अंगावरचे दागदागिने बघून गौरम्मा चकित झाल्या होत्या. कितीतरी प्रकारचे दागिने! हातात सोळा बांगड्या, शिवाय हिऱ्याचे कंगन, हिऱ्याची कानातली, गळ्यात विविध प्रकारच्या चेन्स, मोठ्या काठाची कांजीवरम् साडी!
घरी परतताना सुरभी आणि गौरम्मांना वाटत होतं, चंद्रूनंही जमुनेला पसंत केलं तर किती छान होईल!
जमुनेच्या वडिलांची उटीला असलेली टी-इस्टेट पाहण्यासाठी कृष्णप्पांनी शामण्णा, गौरम्मा आणि सुरभीला आग्रहानं बोलावलं होतं.
पण शामण्णांनी निक्षून सांगितलं, `गौरी, मला तर हे मुळीच पसंत नाही. अजून लग्नाच्या दृष्टीनं काहीच घडलेलं नाही. आपण त्यांचा उगाच पाहुणचार का घ्यायचा? उगाच आपण काहीतरी आशा बाळगणं योग्य नाही. मी तरी येणार नाही.’
`तुम्हाला यायचं नसेल तर येऊ नका! उगाच तुमचे जुन्या काळचे काहीतरी आदर्श! एवढ्या आग्रहानं त्यांनी बोलावलंय. आपण गेलो नाही, तर त्यांना वाटेल- केवढी यांची मस्ती! तुम्ही येणार नसाल तर मी आणि सुरभी जाऊन येऊ.’
उटीमध्ये दोन दिवस पाहुणचार घेऊन येताना निरोपाच्या म्हणून वितभर काठाच्या रेशमी साड्या दोघींनाही मिळाल्या होत्या.
निरोप देताना कृष्णप्पांनी हात जोडून विनयानं म्हटलं, `तुमच्या घरची सून व्हायचं भाग्य माझ्या जमुनेच्या नशिबात आहे की नाही देव जाणे! पण आपले परस्परांशी जुळलेले ऋणानुबंध असेच असू देत!’
घरी आल्यावर गौरम्मा कौतुकानं सांगत होत्या- दोनच दिवसांत सुरभी आणि जमुना यांचा सख्ख्या बहिणींप्रमाणे स्नेह जुळला होता!
आता चंद्रू आला होता. त्यानं जमुनेला बघावं अशी गौरम्मांची फार इच्छा होती. त्यांनी सुचवलं, `चंद्रू, तू आणि सुरभी मुलीला बघायला जा. आम्ही त्यांचं घर, त्यांचा स्वभाव, त्यांच्या घरची बोलण्या-वागण्याची पद्धत पाहिली आहे. मला तर सगळ्या दृष्टीनं हे स्थळ पटलंय. एवढी श्रीमंती असून अत्यंत विनयशील माणसं आहेत!’
`अम्मा, रिक्षासाठी सुटे पैसे लागतील. शंभर रुपये सुटे आहेत?’
हे ऐकून गिरीश हसत म्हणाला, `चंद्रू, बेंगळूर काही एवढं बिघडलेलं नाही. इथल्या इथं जयनगरला जाऊन येण्यासाठी एवढ्या पैशांची गरज नाही.’
`मलाही तसंच वाटलं होत. पण आजच अनुभव आला.'
`का? काय झालं?’
`पोट दुखतंय म्हणून डॉक्टरकडे गेलो होतो. जुना मित्र म्हणून रवीचंद्राकडे गेलो. पोटदुखीवर औषध लिहून द्यायला त्यानं शंभर रुपये फी घेतली.’
`शंभर रुपये? असं कसं शक्य आहे? कालच मीही गेलो होतो त्याच्याकडे. डोकं दुखतंय म्हणून. चाळीस रुपये दिले मी.’
चंद्रू अवाक् झाला. आपल्याला एवढी फी का आकारली? आपला मित्र म्हणवणारा डॉक्टरही आपल्याकडून अधिक पैसे उकळतो! आपण अमेरिकेत राहतो म्हणून? केवळ यासाठी अडीच पट जास्तीची फी यानं घ्यावी?
रवीनं विचार केला असेल- एक डॉलर म्हणजे चाळीस रुपये. अडीच डॉलर्स फी म्हणजे काही जास्त झाली नाही!
चंद्रू अवाक् होऊन उभा होता- कितीतरी वेळ!
रात्री जमुनाला पाहायला येण्यासाठी कृष्णप्पांनी गाडी पाठवून दिली होती. सुरभी आणि चंद्रू मुलगी पाहायला गेले.
दिव्याच्या प्रकाशात जमुनेच्या अंगावरचे हिऱ्याचे दागिने लखलखत होते. कपडेही भारी आणि उठावदार वाटले.
चंद्रूच्या मनानं कौल दिला, विनितेच्या तुलनेत पाहिलं तर ही खूपच डावी आहे.
कृष्णप्पा आणि त्यांच्या पत्नी नम्रपणे बसले होते.
तसं पाहिलं तर जमुनाही सर्वसामान्य चारचौघींसारखी मुलगी होती. बी. एस्सी. पर्यंत तिचं शिक्षण झालं होतं. त्यानंतर ती घरातच होती. वीणा वाजवण्याचं जुजबी शिक्षण तिनं घेतलं होतं. शिवाय भरतकाम, इकेबाना, इंटिरियर डेकोरेशन, बाटीक यांसारख्या कलाही हौसेनं शिकली होती.
किरकोळ निरर्थक गप्पांना कंटाळून चंद्रूनं स्पष्टच विचारलं, `मी तुमच्या मुलीशी थोड्या गप्पा मारू काय?’
`अहो, अवश्य बोला. त्यात काय एवढं!’ कृष्णप्पा म्हणाले.
खोलीत चंद्रू आणि जमुना दोघेच राहिले.
चंद्रूनं सांगितलं, `तुम्हांला आमच्या घरच्या परिस्थितीची माहिती आहे की नाही, ठाऊक नाही. धाकट्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर आहे. आमचं घराणं श्रीमंत नाही. हे आधी सांगावं हे बरं, नाही का?’
`पण तुम्ही तिथंच राहणार की इथं परतणार?’
`आता माझा तिथंच राहण्याचा विचार आहे. तिथलंही जीवन एकांगी असतं. इथं बेंगळूरमध्ये जशा तुम्हाला हव्या तेव्हा, हव्या तेवढ्या मैत्रिणी मिळू शकतात, तसं तिथं नाही.’
`मैत्री करण्याचा स्वभाव असेल तर कुठंही मैत्रिणी मिळू शकतात.’
`आई-वडिलांच्या तुम्ही एकुलत्या एक आहात. दरवर्षी आई-वडिलांना भेटायला जाणार म्हणाल- पण मला तो खर्च परवडणार नाही.’
`तसं काही नाही. माझ्या दिल्ली-कलकत्त्यात राहणाऱ्या मैत्रिणी दोन-दोन वर्षं माहेरी येत नाहीत. माझ्या आई-वडिलांना भेटावंसं वाटलंच तर ते येतील खर्च करून!’
जमुना चंद्रूनं सांगितलेल्या सगळ्या परिस्थितीसाठी तयार असल्याचं दिसत होतं. गौरम्मांनी कधीच हिरवा बावटा दाखवला होता.
पुढच्या आठवड्यात चंद्रूचं लग्न ठरलं. घरात एकच गडबड उडाली. एवढ्या कमी अवधीत कसं सगळं जमवायचं? चंद्रूनं हिंडण्यासाठी एक टॅक्सी ठरवली. त्यानं गौरम्मांच्या हाती लग्नाचा खर्च करण्यासाठी एक लाख रुपये ठेवले. साऱ्या जीवनात, वयाच्या छप्पन वर्षांपर्यंत गौरम्मांनी कधीच एवढे पैसे पाहिले नव्हते! गौरम्मांना काय करू अन् काय नको असं झालं होतं.
त्या म्हणाल्या, `चंद्रू, अरे ती एवढ्या बड्या घरची मुलगी! आपल्याकडून तिला पाच भारी साड्या आणि दोन घसघशीत बांगड्या तरी नको का द्यायला?’
चंद्रूनं समजावलं, `अम्मा, अमेरिकेत फारसं कुणी साड्या नेसत नाही. दोन साड्या पुरेत. उलट तुम्ही सगळ्याजणी इथं साड्या नेसता. वेगवेगळ्या समारंभांना जाता. तुम्हीच चांगल्या साड्या घ्या.’
सगळ्या खर्चाचा हिशोब करून पाहिला तेव्हा बांगड्यांसाठी पैसे राहिले नसल्याचं गौरम्मांच्या लक्षात आलं. शिवाय विहिणीलाही भारी साडी घ्यायला हवी होती. यावरही चंद्रू म्हणाला, `सोनं नको घ्यायला. तिथंच सोनं थोडंफार स्वस्त मिळेल.’
पण गौरम्मांना हे पटलं नाही. त्यांनी स्वत:च्या हातातल्या दोन्ही बांगड्या काढल्या आणि नवीन डिझाईनच्या दोन बांगड्या बनवल्या.
ही गोष्ट आणखी कुणाच्याही लक्षात आली नव्हती. पण घरात वावरत असलेल्या विनितेच्या नजरेनं मात्र ती टिपली होती.
adeswal
Expert Member
Posts: 3283
Joined: Sat Aug 18, 2018 4:09 pm

Re: Romance डॉलर बहू

Post by adeswal »

शामण्णांना तर यातलं काहीच पटलं नव्हतं.
`गहाणवटीचा धंदा करणाऱ्याच्या मुलीला पैशाची किंमत नसते-’ असं त्यांना वाटत होतं. त्यांच्या सात्त्विक जीवन पद्धतीत गहाणवटीचा धंदा करणं म्हणजेच अपराध होता. अशा घरातली मुलगी आपल्यासारख्या शिक्षकी पेशा असणाऱ्याच्या घरी योग्य ठरणार नाही, असं त्यांचं प्रामाणिक मत होतं. पण चंद्रूनं मुलगी पसंत केल्यावर ते तरी काय बोलणार?
गरीब शाळामास्तराच्या बायकोचा खर्चिकपणा पाहून ते दचकले होते. हा सगळा डॉलर-महिमा असल्याचं त्यांनाही ठाऊक होतं. यक्षिणीप्रमाणे डॉलर काहीही जादू घडवू शकेल, हे त्यांना ठाऊक होतं.
चंद्रूलाही याची पुरेपूर जाणीव होती. अमेरिकेत साठवलेल्या तीन हजार डॉलर्समुळे इथं आपली जन्मदात्री किती आनंद घेत आहे, हे पाहून त्यालाही स्वत:चा अभिमान वाटत होता. डॉलर-देशाचं कौतुक करताना त्याला शब्द आणि वेळ अपुरा पडत होता.
गिरीशचं लग्न अत्यंत साधेपणानं झालं होतं. विनितेच्या माहेरी आई-वडीलच नसल्यामुळे हौस-मौज कोण करणार? शिवाय गिरीशनं सुरुवातीलाच `माझं लग्न माझ्या इच्छेप्रमाणे झालं पाहिजे’ असं बजावलं होतं.
त्यामुळे गौरम्मांच्या मनातल्या आशा-आकांक्षांवर थंडगार पाणी ओतल्यासारखं झालं होतं. आता चंद्रूनं मात्र तसं केलं नव्हतं. साऱ्या नातेवाईकांना हेवा वाटावा, भाऊबंधांच्या पोटात दुखावं असं लग्न करण्याची संधी चंद्रूनं देऊन आईचे पांग फेडले होते! मागं आपल्या गरिबीमुळे जे नातेवाईक आपल्याशी तुच्छतेने वागले, त्यांच्या तोंडावर डॉलर-महिमा फेकण्याची संधी गौरम्मांना त्यांच्या पोटच्या मुलानं मिळवून दिली होती.
अमेरिकेत राहणारा मुलगा, मोठ्या सावकाराची मुलगी सून म्हणून आलेली. सगळे नावाजत असलेल्या `चामराज कल्याण मंडपा’त तीन दिवस लग्नाचा थाट चालला होता. फुलांचं भरपूर डेकोरेशन, संगीताचा विशेष कार्यक्रम, आरती-अक्षतांचा थाट- सगळेजण असूयेनं लग्नाचं वैभव पाहत होते.
घरात लग्नाआधी प्रचंड काम होतं. गिरीशनं बाहेरची सगळी कामं पाहिली आणि विनितेनं घरची खिंड लढवली. हे जोडपं कुठंही दिसत नसलं तरी नांगराला जुंपलेल्या बैलजोडीप्रमाणे दोघंही अविश्रांत राबत होते.
पण डोळ्यांवर पैशाची झापड आल्यामुळे सुरभी आणि गौरम्मांना यातलं काहीही दिसत नव्हतं. त्या दोघींना आता फक्त जमुनाच दिसत होती.
लग्नाच्या बस्त्याची खरेदी करताना मात्र चंद्रूनं मुद्दाम सांगितलं, `अम्मा, गिरीशच्या बायकोसाठीही एक उत्तम साडी घे.’
`का? तिच्या लग्नातली आहेत लुगडी. शिवाय तू अमेरिकेतून आणलेली साडीही आहेच. उगाच आता जास्तीचा खर्च!’
`असू दे. तिच्यासाठी भारी रेशमीच घे.’
गौरम्मांना हे पटलं नाही. पण मुलगा पैसे देत असल्यामुळे त्या गप्प राहिल्या.
चंद्रूनं जांभळ्या रंगाची भारी साडी विनितेसाठी वेगळी काढली तेव्हा गौरम्मांनी भुवया उडवल्या. सहा हजाराची साडी!
`अरे चंद्रू, एवढी महागाईची साडी कशाला रे तिला?’ न राहवून गौरम्मांनी विचारलं.
चंद्रू शांतपणे म्हणाला, `अम्मा, मी धारवाडमध्ये असताना हात मोडला होता ते आठवतंय ना? मी त्यांच्या घरचा भाडेकर होतो. तरीही त्यांनी माझं खूप केलं होतं.’
जमुनानं मात्र फारसा विचार न करता नवऱ्याचे पन्नास हजार आणि वडिलांचे लाखभर रुपये खर्च करून भरपूर साड्यांची मनसोक्त खरेदी केली.
सुरभीनंही हट्टानं पाच-सहा भारी साड्या घेतल्या.
घरी आल्यावर चंद्रूनं विनितेला तिची साडी दाखवली. तेव्हा ती आनंद आणि संकोचानं म्हणाली, `उगाच का माझ्यासाठी एवढी भारी साडी घेतलीत?’
`मुद्दाम आणलीय मी ती! मी तुमच्या गावी असताना तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंत, त्याची ही अत्यंत छोटीशी परत-भेट आहे!’ चंद्रूनं सांगितलं.
त्याला आठवलं, विनितेनं मोठ्या हौसेनं जांभळी साडी मागितली असता तिला निळी साडी मिळाली होती. अनेक निराशा सहज स्वीकारणाऱ्या विनितेच्या दृष्टीनं ही घटना नेहमीसारखीच साधी होती. त्यामुळे कदाचित तिला या घटनेचा विसरही पडला असावा. पण चंद्रूला तो प्रसंग अजूनही जशाचा तसा आठवत होता.
तो मनात म्हणाला- त्याच वेळी तुझी इच्छा पूर्ण करावंसं वाटलं तरी, सामाजिक कारणांमुळे मी माझ्या इच्छेला दडपून टाकलं होतं. आता थोरला दीर या नात्यानं तुला ही साडी देऊन मी माझी इच्छा पूर्ण करतोय.
त्याला ठाऊक होतं, आजच्या त्या घरच्या परिस्थितीत विनिता स्वत: मिळवती असूनही अशी भारी साडी विकत घेऊ शकणार नाही. त्याच्या नजरेनं तिच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद टिपला होता.
चंद्रूचं लग्न थाटामाटात पार पडलं. सारं बेंगळूरच लग्नाला आलंय की काय, असं वाटण्याइतकी गर्दी झाली होती. राजकारणी, धनाढ्य माणसं, अधिकारी आले होते.
दोन्ही मुलांच्या लग्नाचा थाट एकाच लग्नात अनुभवायला आल्यामुळे गौरम्मा अभिमानानं फुलून आल्या होत्या.
अगदी तृप्त-तृप्त झाल्या होत्या.
त्यातच जमुनाच्या आई निरोपाच्या वेळी डोळे पुसत म्हणाल्या, `गौरम्मा, माझ्या जमुनाला तुम्ही तुमच्या सुरभीसारखीच माना. काही चूक झाली असेल तर क्षमा करा. लग्नात काही त्रुटी राहिल्या असतील तर राग मानू नये.’
लखलखणाऱ्या प्रत्येक वस्तूला हिराच मानणाऱ्या गौरम्मा विहिणीच्या नाटकी बोलण्यावर भाळल्या. शिवाय त्या बोलण्यासोबत असलेली निरोपाची जरतारी साडी आणि ओटीच्या थाटामुळे त्यांचा त्या बोलण्यातल्या प्रामाणिकपणावर विश्वास बसला.
जी शक्ती पैशांमध्ये आहे, ती कधीच गुणांमध्ये नसते. ज्यांच्याकडे पैसे नाही, तेच पैशाविषयी उपरोधानं बोलतात!
चंद्रूची सुट्टी संपत आली होती. आणखी दहा दिवसांनी त्याला पुन्हा अमेरिकेला जायचं होतं. हनीमूनसाठी चंद्रू आणि जमुना उटी-मद्रासला जाऊन आले. व्हिसाच्या कामासाठी जाणं आवश्यकही होतं.
बघता-बघता चंद्रूच्या निघण्याचा दिवसही आला. गौरम्मांचे डोळे पाण्यानं भरले. आईला अभिमान वाटावा असा मुलगा आईच्या साऱ्या इच्छा पुऱ्या करून निघाला होता.
चंद्रूनं सांगितलं, `अम्मा, यानंतर सुरभीच्या लग्नासाठीच मी येईन. जमुनाचा व्हिसा मिळून तिला यायला बरेच दिवस लागतील. व्हिसा मिळेपर्यंत तिला इथेच राहू दे.’
`राहू दे ना! अरे, तीच या घरची थोरली सून आहे! आमचे स्वभाव आणि आपल्या घरच्या पद्धतीशी तिलाही जुळवून घ्यायला वेळ मिळेल.’
चंद्रूच्या विमानानं आकाशात झेप घेताच जमुना थेट माहेरी निघून गेली. निघण्याआधी सासूला तिनं लाघवीपणे सांगितलं, `आमच्या घरी फोन आहे ना! अमेरिकेला पोहोचल्यावर ते फोनवर कळवणार आहेत. त्यामुळे आता आईकडेच जाते. लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांचाही निरोप घेऊन येते. चालेल ना?’
`तसंच कर. यायची अजिबात घाई करू नकोस. तेही तुझंच घर आहे ना!’ गौरम्मा म्हणाल्या.
त्यानंतर जमुना आली ती `आज मी निघाले’ म्हणून सांगण्यासाठीच! कोईमत्तूरची मावशी, दिल्लीचे काका, मुंबईचे मामा अशा सगळ्यांच्या घरी जाऊन ती व्हिसा आल्यावरच परतली होती.
गौरम्मांना मात्र ती लटक्या वैतागानं म्हणाली, `छे! अगदी वैताग आलाय मला! सगळे सांगत होते- अमेरिकेचा व्हिसा लवकर मिळत नाही म्हणून! म्हणून मी सगळ्या नातेवाईकांना भेटायला गेले होते. आधी ठाऊक असतं तर मी मुळीच गेले नसते. तुमच्याबरोबर आणि सुरभीबरोबर थोडे दिवस का होईना, राहायची फार इच्छा होती. अगदी निराशा झाली!’
शामण्णांना त्यामागचं नाटक समजलं.
पण डॉलर-सुनेच्या प्रभावामुळे अंध झालेल्या गौरम्मांना मात्र ते दिसलं नाही. जमुनेचं सारं बोलणं त्यांना शब्दश: पटलं.
`असू दे गं! किती निर्मळ मनाची आहेस तू! सुरभीच्या लग्नाच्या आधी मात्र दोन महिने ये. लग्नघरात तूच महालक्ष्मीसारखी वावरली पाहिजेस! लग्नानंतरही दोन महिने राहून जा. म्हणजे माझंही समाधान होईल. आता तू आनंदानं जाऊन ये.’
विनिता मूकपणे गौरम्मांचं वागणं-बोलणं पाहात होती.
जमुना तिच्याशी अवाक्षरही बोलली नव्हती. अगदी समोरासमोर येण्याचे प्रसंग आले तरी एखाद्या अपरिचित व्यक्तीबरोबर बोलावं तसं जमुनाचं बोलणं- वागणं होतं. ही गहाणवटीचा व्यवहार करणाऱ्या घरात जन्मलेली मुलगी आहे, हे विनितेच्या चलाख बुद्धीला जाणवल्याशिवाय कसं राहील? ती गरीब घरातून आली असली तरी बुद्धीची तिथं कमतरता नव्हती.
जमुना अमेरिकेला निघाली. तिला विमानतळावर सोडून आल्यावर गौरम्मा म्हणाल्या, `किती नम्र स्वभावाची आहे ही जमुना! अशी सून मिळण्यासाठी मागच्या जन्मीचं पुण्यच पदरी असायला पाहिजे.’
शामण्णा खिडकीबाहेर पाहात होते. त्यांनी जीवनाकडून विवेकाचे धडे घेतले होते. अनुभवातून खूप शहाणपण ते शिकले होते. त्यांच्या मनात येत होतं- जगात गौरीसारखी माणसंच भरपूर असतात... श्रीमंत माणसं भेटली की अवघडल्यासारखी होतात– पण तरीही त्यांचा आदर-सत्कार करतात.
आपल्यापेक्षा गरीब माणसं भेटली की, हीच माणसं त्यांना हीन लेखतात आणि त्यांना अवमानानं वागवतात.
खराखुरा स्नेह परस्परांविषयी अशी टोकाची भावना कधीच ठेवत नाहीत.
पण पैशाच्या मोहजालात गुरफटून गेलेल्या गौरम्मांना मनाच्या तरल स्वरपाची कल्पना कशी येणार?
चंद्रूच्या लग्नानंतर घरात एक नवीन पद्धत सुरू झाली. घरची सून होऊनही अपरिचित असलेल्या जमुनेचं वर्णन सदोदित सुरू झालं. सतत तिच्या असलेल्या नसलेल्या गुणांचा महिमा असलेली गाणी घरभर ऐकू येऊ लागली.
एवढ्यावर ते थांबलं नाही.
प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जमुना आणि विनितेची तुलना सुरू झाली.
चंद्रूचं लग्न ठरेपर्यंत विनिता त्या घरची लाडकी सून होती. तिच्या शब्दाला घरात किंमत होती. गौरम्माही मोकळेपणानं म्हणायच्या, `आमची विनिता घरी आली आणि मी निवृत्त झाले बघा!’
पण आता मात्र त्या भावनेची पुसटशी छायाही त्यांच्या बोलण्या-वागण्यात दिसत नव्हती. विनितेलाही हे जाणवत होतं. नाहीतरी जगात धनवंतांची तळी उचलून येळकोटाचा घोष करतात ना? पैसा असेल तर माणसाला सूर्याचं स्थान मिळतं आणि नसेल तर श्वानाची अवस्था प्राप्त होते.
हळूहळू घरात नसलेल्या जमुनेचं स्थान प्रत्येक्ष सूर्यासारखं होऊ लागलं आणि विनितेची अवस्था कुत्र्यासारखी झाली.
घरी कुणी आलं की, चंद्रूचं लग्न, लग्नाचा अल्बम, व्हीडीओ कॅसेट हेच विषय बोलले जात. जमुनाच्या घरच्यांनी दिलेल्या दागिन्यांच्या यादीचं वाचन, जमुनाचा सरळ स्वभाव याचं गुणगान सुरू होई. जमुनेनं आपले सगळे दागिने माहेरी ठेवल्यामुळे ते दाखवता येत नसल्याची खंत न करता गौरम्मा सांगत, `अहो, आमचं घर एवढंसं! इथं किती चांदीची भांडी ठेवायची? शिवाय नसती जबाबदारी आपण तरी कशाला उगाच अंगावर घ्यायची?
हा विषय सुरू झाला की, शामण्णा काहीतरी निमित्त काढून घराबाहेर निघून जात. पण स्वयंपाकघरातल्या विनितेनं कुठं जायचं?
या विषयात अधिक भर घालण्यासाठी अधूनमधून जमुनेची पत्रं येत होती. प्रवासाची वर्णने, विविध रेशमी साड्यांमधले रंगीबेरंगी फोटो, गाडीच्या मॉडेलची चर्चा, अमेरिकेमधली आश्चर्ये यांचा त्यात समावेश असे.
असं एखादं पत्र आलं की, गौरम्मांचे पाय जमिनीवर पडेनासे होत. गिरीश आणि शामण्णा अलिप्त होऊन जात. सुरभी आणि गौरम्मा मात्र मंत्रमुग्ध होऊन जात. विनितेचा सारा दिवस मात्र खिन्नतेत जात असे.
त्या दिवशी अर्धा दिवसच शाळा होती. टीचर्स रूममध्ये मुलांच्या वर्गापेक्षा जास्तीचा दंगा होता.
शाळेतल्या प्रौढ शिक्षिका सुशीला यांना विनितेविषयी विशेष आस्था होती. विनिता मनापासून आपलं काम करते, शक्य तेवढी सगळ्यांना मदत करते, कुणाशी भांडत नाही, मुलांचाही तिच्यावर विशेष लोभ आहे, नेहमी हसतमुख असते- या साऱ्यांचं त्यांना फार कौतुक होतं.
त्या विनिताला म्हणाल्या, `आपण सगळ्याजणी मिळून `मुघले आझम’ बघायला जायचं? गाणी फार छान आहेत.’
`होय मॅडम, मागं कॉलेजमध्ये शिकताना मी पाहिलाय तो सिनेमा. गाणी फारच चांगली आहेत.’
विनिता काही क्षण भूतकाळात रमली. धारवाडच्या रीगल थिएटरात मैत्रिणींबरोबर तिनं तो सिनेमा पाहिला होता. किती सुंदर दिवस होते ते! क्लास चुकवून सिनेमाला जाऊन आल्यानंतर कितीतरी दिवस मैत्रिणी लेडीज रूममध्ये तिला `मुहोब्बत की झूटी कहानी पे रोये’ गायला लावत. लेडीज रूमलगतच्या वर्गात इकॉनॉमिक्सचा कंटाळवाणा क्लास चालला होता. वर्गातल्या मुलांनीही आरडाओरडा केला होता, `सर, इकॉनॉमिक्स नको. कॉलेजच्या मधुबालेसारख्या असणाऱ्या लता मंगेशकरकडून `मुहोब्बत की झूटी-’ ऐकायचं आहे!’ तसं त्यांनी नोटीस बोर्डावरही लिहून ठेवलं होतं. वर्गातली ती सगळी मुलं आणि मुली आता कुठं असतील? मी ही इथं अशी आहे! ते सुंदर दिवस कुठं निघून गेले?
`मग? काय ठरलं? जायचं ना?’
विनिता भानावर आली.
`नको. मी घरी सासूबार्इंना सांगितलं नाही. पुन्हा कधीतरी येईन.’
`चला हो जाऊ या! मी सांगेन तुमच्या सासूबार्इंना.’
जवळ कुणी नाही, हे पाहून त्या विनितेच्या कानाशी कुजबुजल्या, `विनिता, तुम्हाला आणखीही एक सांगायचं होतं.’
विनिता ऐकू लागली. काय सांगायचंय यांना?
`तुमचे सासरे किती मानी आहेत, हे मला ठाऊक आहे. त्यांचा स्वभावही आम्ही अनेक वर्षे पाहिला आहे. म्हणून मुद्दाम तुम्हांला सांगतेय मी.’
`काय झालं?’
नाही म्हटलं तरी विनितेच्या आवाजात चिंता डोकावू लागली.
`आठ-दहा दिवसांपूर्वी मी मॅटिनीला गेले होते. बाल्कनीमध्ये पुढच्या रांगेत तुमची सुरभी एका मुलाबरोबर बसली होती. ती मला ओळखत नाही. पण मी तिला ओळखते. अंधारात दोघांची बरीच घसट चालली होती.’
विनितेला कुणीतरी अचानक मस्तकावर प्रहार केल्यासारखं झालं.
`तो मुलगा कोण होता? तुम्ही त्याला ओळखता काय?’
`होय. आमच्या गल्लीच्या टोकालाच राहतो तो. गोपीनाथ त्याचं नाव. मुलगा दिसायला खूपच देखणा आहे. बी. एस्सी. झालाय. अजून तरी त्याला नोकरी मिळालेली नाही. कुठंतरी पार्टटाईम नोकरी करतो असं ऐकलं होतं. बाकी मुलगा काही वाईट नाही. कुठलंही व्यसन नाही. तुम्हीच आणखी चौकशी करा.’
सारं ऐकून विनिता बधिर होऊन बसून राहिली.
सुरभीला नवरा अत्यंत देखणा हवा होता. शिवाय तिच्या पत्रिकेप्रमाणे तिला सासू नसलेल्या घरी देणं आवश्यक होतं. त्यामुळे तिचं लग्न जुळायला वेळ लागत होता. उन्हा-पावसाची फिकीर न करता सुरभीचे आई-वडील-भाऊ तिच्या लग्नासाठी धडपडत होते. एखादं लग्नाचं स्थळ समजलं की, विलंब न लावता ते त्यांच्याशी संपर्क साधत.
असं असताना सुरभी अशा निरुद्योगी मुलाशी का स्नेह वाढवत आहे?
जड मनानं विनिता घराच्या दिशेनं चालू लागली. सिनेमा पाहायचा उत्साह ओसरून गेला होता. भावंडांचं प्रेम न मिळालेल्या विनितेचा सुरभीवर जीव जडला होता. तिलाही आपल्याप्रमाणे चांगला पती मिळावा म्हणून ती दररोज देवाला प्रार्थना करायची.
परवाच कुणीतरी म्हणत होतं, दुर्गापरमेश्वरीला नवस बोलला तर मनासारखा पती मिळतो. तिनं सुरभीसाठी नवस बोलला होता, दर्शनाला जाऊन आली होती. येताना देवीच्या प्रसादाच्या काळ्या बांगड्या आणून तिनं सुरभीला दिल्या होत्या.
विनितेच्या मनात आलं, खरोखरच सुरभीचा या गोपीनाथवर जीव जडला असेल काय? सुरभीलाच या संदर्भात विचारलं तर? पण कुठलाही चोर आपली चोरी मान्य करत नसतो हे तिला आठवलं.
कदाचित अंधारात सुशीला मॅडमनी सुरभीऐवजी आणखी कुणाला तरी पाहिलं नसेल कशावरून?
या विचारासरशी विनितेचा गोंधळ उडाला. गिरीशला ही बातमी सांगायचाही तिला संकोच वाटला.
ही केवळ फुटकळ बातमी नव्हती. सुशीलाही उगाच काहीतरी, खात्री झाल्याशिवाय बोलणाऱ्या बाई नव्हत्या.
प्रत्यक्ष नजरेनं पाहिलं तरी पुन्हा खात्री करून घे म्हणून मोठी माणसं सांगतात ना? आणखी थोडे दिवस वाट पाहणं चांगलं, असं विनितेनं ठरवलं.
फार दिवस वाट पाहावी लागणार नाही, याची तिलाही तेव्हा कल्पना नव्हती.
सोबत नोकरी करणाऱ्या राजलक्ष्मीचं लग्न ठरलं होतं. लग्नानंतर नोकरी सोडून तिला दिल्लीला जावं लागणार होतं. त्यामुळे तिनं राजीनामा दिला होता.
राजलक्ष्मीला निरोप देण्यासाठी एक पार्टी द्यायचं ठरवलं. `चालुक्य’मध्ये पार्टी ठरली होती. संपूर्ण पार्टीची जबाबदारी विनितेवर होती. त्यामुळे विनिता ठरलेल्या वेळेआधी अर्धा तास चालुक्य हॉटेलवर आली.
पार्टीची व्यवस्था चालली होती. योग्य त्या सूचना करून विनिता खिडकीकडेच्या टेबलापाशी विसावली. बाहेर उन्हाचा कडाका जाणवत होता. ग्लासभर ज्यूसची आर्डर देऊन ती खिडकीबाहेर पाहात बसून राहिली.
बाहेरचं दृश्य पाहून ती घाबरी झाली.
सुशीला मॅडमनी सांगितलं होतं त्यात आता शंका राहिली नव्हती.
तिनं पुन्हा-पुन्हा खात्री करून घेतली. होय. तिची नणंद सुरभीच होती ती! एका सुस्वरप तरुणाबरोबर विडा खात रिक्षाची वाट पाहत होती. तिनं विनितेला पाहण्याचा प्रश्नच नव्हता.
रिक्षा थांबली. सुरभी आणि तो तरुण– बहुतेक गोपीनाथ– दोघंही तिथून निघून गेले.
आता सुशीला मॅडमनी जे सांगितलं होतं, त्यावर अविश्वास दाखवण्याचं कारणच नव्हतं.
विनितानंही निर्णय घेतला- यानंतर गप्प बसण्यात अर्थ नाही. घरातल्या वडील माणसांच्या कानांवर घालावं हे उत्तम!
रविवारचा दिवस. सगळे घरातच होते. विनितेनं सारी हकीकत गिरीशच्या कानांवर घातली होती.
गिरीश म्हणाला, `अण्णांना सांगितलं पाहिजे.’
सासूबार्इंना सांगायला विनितेला संकोच वाटला- अंहं- भीती वाटली.
`अण्णा, एक सांगू? सुरभी माझ्या बहिणीसारखी आहे-’
खिडकीवरची धूळ झटकत असलेले शामण्णा मागं वळले. विनितेकडे पाहत त्यांनी विचारलं, `कशाची पूर्वतयारी ही? मी काही तुला आज ओळखत नाही! सुरभीच काय, सगळं घरच तुझं नाही काय?’
`तसं नाही- सुरभीची गोपीनाथ नावाच्या मुलाशी बरीच मैत्री आहे म्हणे-’
`मैत्री? कशा प्रकारची मैत्री? तुला कुणी सांगितलं?’
`सुशीला मॅडमनी सांगितलं; पण त्या वेळी मी त्यावर विश्वास ठेवला नाही. काल मीही पाहिलं.’
परसातून आलेल्या गौरम्मा मागं उभ्या असल्याचं विनितेनं पाहिलं नव्हतं.
त्यांनी विचारलं, `कोण हा गोपीनाथ? काय करतो?’
adeswal
Expert Member
Posts: 3283
Joined: Sat Aug 18, 2018 4:09 pm

Re: Romance डॉलर बहू

Post by adeswal »

गौरम्मांच्या स्वरातल्या कठोरपणानं विनिता घाबरी झाली. परक्या व्यक्तीनं आपल्या पिल्लांना हात लावल्यावर मांजरीला राग येतो, तसा तो राग होता.
`मला नक्की ठाऊक नाही, पण बी. एस्सी. झालाय आणि पार्टटाईम नोकरी करतो असं समजलं.’
`आपल्याला कळू न देता मुलाला भेटली आहे ही? आपली सुरभी अशी नाहीच!’
गौरम्मांच्या मातृहृदयानं ग्वाही दिली- आपली सुरभी अशी वागणंच शक्य नाही!
`आपण सुरभीलाच विचार या. उगाच अपसेट व्हायचं कारण नाही!’ एवढं बोलून शामण्णांनी विषय तिथंच थांबवला.
गौरम्मा अपार दु:खात बुडून गेल्या होत्या.
सुनेनं हे गुपित शोधून काढल्यामुळे त्यांच्या दु:खाची तीव्रता वाढली होती. सुरभीनं किती मामुली मुलगा शोधला याचं दु:ख त्यांना पराकोटीचं झालं होतं.
चंद्रू अमेरिकेहून येऊन गेल्यापासून आणि जमुनेचे तिकडचे फोटो पाहिल्यापासून त्यांचा आणखी एक विचार पक्का होत चालला होता. कर्ज काढावं किंवा प्रसंगी घर विकावं लागलं तरी हरकत नाही, सुरभीचं अमेरिकेत असलेल्या मुलाशीच लग्न लावून दिलं पाहिजे. तिनंही वैभवपूर्ण जीवन जगलं पाहिजे.
पण शामण्णांचे विचार वेगळेच होते.
त्यांना वाटत होतं, हा गोपी खरोखरच चांगला मुलगा असेल आणि त्याची कष्ट करायची तयारी असेल तर, सुरभीच्या मनाप्रमाणे तिचं त्याच्याशी लग्न लावून द्यायला काहीच हरकत नाही. फार तर त्याला नोकरी लागेपर्यंत थांबावं लागेल. सुरभी आपली एकुलती एक मुलगी- ती सतत आपल्यासमोर राहील. तिच्या अडी-अडचणींच्या वेळी आपणही मदत करू शकू.
देवळातून घरी परतलेल्या सुरभीला घरातल्या बदललेल्या वातावरणाचा वास आला. संतापानं गौरम्मा लालबुंद झाल्या होत्या. खिन्न होऊन कामं करणारी वहिनी, नेहमीपेक्षा वेगळ्या मूडमध्ये असलेले अण्णा! घरात गोपी-प्रकरण समजलं असेल काय? वहिनीच नोकरीच्या निमित्तानं घराबाहेर पडत असते. या विनिता वहिनीनंच सांगितलं असेल-
तिचं वय गोपीच्या प्रेमात पडायचंच होतं. सारं जगच तिला प्रेममय वाटत होतं. देखण्या गोपीनंही नोकरीचा गंभीरपणे विचार केला नव्हता. शिक्षणात बेताचा असला तरी सगळे त्याच्या स्वभावाविषयी बरं बोलत होते. कॉलेजमध्ये असल्यापासून त्या दोघांची ओळख होती. घरात सांगायची त्यालाही भीती वाटत होती. त्यामुळे चोरून त्यांच्या भेटी होत.
तूर्त गोपी एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये पार्टटाईम शिकवण्याची नोकरी करत होता. त्यानं अजून लग्नाचाही विचार केला नव्हता.
गौरम्मांना यातलं काहीच उमजत नव्हतं. सुरभीनं त्यांना आपल्याला गोपीविषयी जे वाटतं ते सांगितलं.
सारं ऐकून त्या आणखी दु:खी झाल्या. म्हणाल्या, `सुरभी, तू अजून लहान आहेस. तुला काहीही कळत नाही. गोपीशी लग्न केलंस तर काय मिळणार आहे तुला? एकेक पैसा साठवत संसार करावा लागेल तुला! विनिताचं पाहतेस ना? किती राबावं लागतं तिला! एवढं करून जेमतेम चार हजार रुपयेही पगार नाही मिळत! अमेरिकेच्या हिशेबानं पाहिलं तर शंभर डॉलर सुद्धा पगार मिळत नाही. तेच जमुनेचं पाहिलंस की नाही? ती इथं येईल तेव्हा लाखो रुपये सहज खर्च करेल. फोटोमध्ये पाहिल्यास नं कसल्या भारी गाड्या आणि घरं? तुला सुखानं जगायचं असेल तर या दरिद्री प्रेमाचा नाद सोडून दे!’
सुरभीवर प्रभाव टाकण्यासाठी त्यांनी पुन्हा अमेरिका-पुराण सुरू केलं.
स्वयंपाकघरातून सारं ऐकणाऱ्या विनितेचा स्वत:च्या कानांवर विश्वास बसत नव्हता. काय सांगतेय हे आई मुलीला? ज्याच्यावर मन बसलं, त्याच्याशी लग्न करायचं की जिथं डॉलरचा ओघ आहे, तिथं करायचं?
संध्याकाळी घरी आलेला गिरीश सांगत होता, `अम्मा, सगळीकडे मी चौकशी केली. गोपी चांगला मुलगा आहे. आई नाही. वडील अत्यंत सभ्य आहेत. वडील कारकून म्हणून निवृत्त झालेत. हा एकुलता एक मुलगा. कसलंही व्यसन नाही. कॉम्प्युटरचं ज्ञान आता घेतोय. नोकरी निश्चित मिळेल.’
`कुठली नोकरी मिळेल? किती पगार मिळेल?’
`ऑपरेटर होईल. आणखी कष्ट घेतले तर आणखी चांगली नोकरी मिळून शकेल. कॉम्प्युटर-सेल्स-लाईनीत शिरला तर चांगलं जगता येईल एवढं नक्की कमावू शकेल. मला वाटतं, विचार करायला काही हरकत नाही.’
`तुझ्या मुलीला तू दिली असतीस का अशा मुलाला?’
`न जन्मलेल्या मुलीला मध्ये आणून हा प्रश्न विचारलास तर मी काय उत्तर देऊ, अम्मा? तरीही सांगतो. माझ्या मुलीनं गोपीसारख्या मुलावर प्रेम केलं, तर तिचं मन न मोडता मी जरूर लग्न लावून देईन!’
`पण मी देणार नाही! मला अमेरिकेत नोकरी करणाराच जावई पाहिजे!’
आईच्या स्वभावाची कल्पना असल्यामुळे गिरीश गप्प बसला.
आईला प्रेमाविषयी सांगणाऱ्या सुरभीला मात्र आईचं बोलणं तत्क्षणी पटलं!
सासूचं डॉलर-प्रेम अपरिचित नसलं तरी आजच्या त्यांच्या वागण्यामुळे विनितेच्या मनावर आघात झाला होता.
गोपी-प्रकरणामुळे गौरम्माही सावध झाल्या. त्यांनी अनेक विवाह-एजंटस्‌शी संपर्क साधला आणि सांगितलं `आम्हांला इथला मुलगा नको. परदेशात- त्यातही अमेरिकेतलं स्थळ सांगा. कितीही खर्च झाला तरी चालेल.’
आपली मुलगी सुखात राहावी असं कुठल्याही आईला वाटणं स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. सुनेनं सुखात राहावं असं वाटणं मात्र अस्वाभाविक आहे! मुलांना कर्जाच्या खड्ड्यात लोटून मुलींना स्वर्ग-सुखाच्या शिखरावर चढवणं योग्य आहे असं कोण म्हणेल? शिवाय सुख-समाधान ही काही पैसे खर्च करून मिळणारी गोष्ट नव्हे. डॉलरही ते देऊ शकत नाही. तरीही ही गौरी अशी का वागते?- शामण्णा अधिकच गंभीर होत होते.
गौरम्मांनी मात्र कुणाचंही ऐकायचं नाही, असा अचल निर्धार केला होता. एजंटस्‌ही तोंडापुढे सांगायचे, `ठीक आहे. तसं स्थळ असेल तर जरूर कळवू!’ मागं मात्र म्हणायचे, `गौरम्मांचा नवा विक्षिप्तपणा पाहिलात ना? सोवळ्या ओवळ्याचं अवडंबर, हातात काचेच्या बांगड्या आणि अंबाडा घालणाऱ्या गौरम्मा मुलगा अमेरिकेत गेल्यावर किती बदलल्या आहेत! जगात तेवढा एकच देश आहे, इतर सगळी माणसं भिकारी आहेत अशा प्रकारे बोलतात या!’
नाविकानं एकाग्रपणे ध्रुवताऱ्यावर लक्ष ठेवावं तसं त्या केवळ अमेरिकेवर डोळा ठेवून होत्या.
गोपी-प्रकरणानंतर मायलेकींनी विनितेशी बोलणं कमी केलं. त्यांना वाटलं, हिनंच गिरीशचे कान फुंकून सुरभीचं गोपीशी लग्न का करू नये हे पटवलं असावं.
लग्न ठरवणारे एक दलाल लक्ष्मणराय एक दिवस त्यांच्या घरी आले.
`शामराय, माझ्या मित्राचा- राजारायांचा मुलगा अमेरिकेत राहतो. शेखर त्याचं नाव. त्याला विचारणार काय सुरभीसाठी?’
स्वयंपाकघरात चुलीवरचं दूध अगदी उतू येत होतं. तिथं दुर्लक्ष करून गौरम्मा लगबगीनं उठल्या. पायात येणाऱ्या साडीच्या निऱ्यांकडे दुर्लक्ष करत त्या बाहेर धावल्या. त्यांच्या कानावर `अमेरिका’ हा परवलीचा शब्द पडला होता.
पुराणात कृष्णाच्या बासरीच्या स्वरांनी वेडावून गोपीकन्या धावत यायच्या, असं वर्णन करतात- तीही असलीच काहीतरी मंत्रशक्ती असावी!
`आपल्या सुरभीची पत्रिका द्या.’
`थोडं थांबा बघू! लक्ष्मणराय, त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते तरी समजू द्या!’ शामण्णा म्हणाले.
`त्यांच्या सगळ्या अपेक्षा आम्हांला मान्य आहेत.’ गौरम्मा मध्येच म्हणाल्या.
`त्यांच्या अपेक्षा बेताच्याच आहेत. हिऱ्याच्या कुड्या, अमेरिकेचं तिकीट, दोन किलो चांदी, पन्नास तोळे सोनं एवढं मला ठाऊक आहे. शिवाय तीन दिवसांचं चांगलं लग्न. योग्य तो मानपान. हुंडा मात्र अजिबात नको!’
`बाप रे! फार झालं हे! दोन-तीन लाखांचं हेच बजेट झालं!’ शामण्णा म्हणाले.
तिकडे लक्ष न देता गौरम्मा म्हणाल्या,
`नाहीतरी आम्हांला कुठं चार-दोन मुली उजवायच्या आहेत? ते मागतील तेवढं सगळं आम्ही देऊ. मुलांना आम्ही शिक्षण दिलंय ना? ते फेडतील बहिणीच्या लग्नाचं कर्ज! गरज पडली तर घरही विकायला हरकत नाही!’
`काय बोलतेस गौरी तू? या वयात घर विकून आपण काय करायचं? अमेरिकेला जायचं की भाड्याचं घर घेऊन राहायचं? माणसानं अंथरण पाहून पाय पसरायला पाहिजेत. आपण या फंदात पडायला नको!’ शामण्णांनी नाना प्रकारे विनवलं.
तरीही गौरम्मांनी आपला हेका सोडला नाही, `आपण भाड्याच्या घरात राहू; पण माझ्या मुलीनं अमेरिकेत सुखात राहिलं पाहिजे!’


लक्ष्मणरायांनी मध्यस्थी स्वीकारली. दुसरे दिवशी शेखर येत असल्याचीही त्यांनी बातमी आणली. गौरम्मा हरखून गेल्या. लेकीचं लग्नच ठरल्यासारखा त्यांना आनंद झाला.
दिसायला सुरभी चारचौघींसारखीच होती. आईच्या नजरेला मात्र ती स्वर्गसुंदरी वाटत होती.
सतत प्रणयरम्य कादंबऱ्या वाचण्यात गढून जाणारी सुरभी आईला विदुषी वाटत होती.
सकाळी नऊ वाजता अंथरुणातून उठणाऱ्या आळशी मुलीला त्या कौतुकानं `हळूबाई’ म्हणत.
केवळ चित्रपटातली गाणी ऐकण्यात वेळ घालवणारी सुरभी गौरम्मांच्या दृष्टीनं संगीतप्रिया होती.
गौरम्मांनी सारं घर दोनदा धुऊन-पुसून काढलं. सुनेला सांगून उपीट, वडे, शिरा करायला लावला.
विनिता गर्भारशी होती. तरीही नणंदेला बघायला पाहुणे येताहेत म्हटल्यावर स्वत:ला जपत तिनं सगळी तयारी दिवसभर राबून केली.
ठरलेल्या वेळी सगळं घर तयार झालं; पण कुणीच आलं नाही.
गिरीश म्हणाला, `एकाच दिवसात चार-सहा मुली बघण्याचा प्लॅन असेल म्हणून उशीर झाला असेल.’
अखेर दीड-दोन तास उशिरा शेखर, त्याचे वडील, बहीण आणि चार-सहा अपरिचित मित्र येऊन पोहोचले. आल्यानंतर त्यांनी आपल्याकडून उशीर झाल्याबद्दल क्षमाही मागितली नाही.
राजारायांची तीक्ष्ण नजर नंतर साऱ्या घरावरून फिरली. कुठंच श्रीमंतीचं दर्शन होत नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर भाव उमटले- ही दरिद्री माणसं माझ्या मुलाला काय देतील! त्यांनी मनातल्या मनात लक्ष्मणरायांना शिव्या घातल्या- या म्हाताऱ्यानं उगाच आमच्या मुलाचा वेळ फुकट घालवला! त्यांच्या चेहऱ्यावर निरुत्साह दिसू लागला.
सुरभी गरम केलेलं खाणं घेऊन बाहेर आली. तिच्या सावळ्या रंगावर पांढरी पावडर उठून दिसत होती. जमुनानं आपल्या जुन्या साड्या तिला दिल्या होत्या. त्यांतली हिरवी साडी ती नेसली होती- पण तो रंग तिला मुळीच शोभत नव्हता.
शेखरनं चेहरा दुसरीकडे वळवला. त्याची नजर विनितेवर पडली. गर्भारशी विनितेची गणना सुंदर स्त्रियांमध्ये सहजच होत होती.
लक्ष्मणराय उगाच काहीतरी अनावश्यक गप्पा मारत प्रसंग साजरा करू पाहात होते.
गिरीशनं विचारलं, `माझा थोरला भाऊही अमेरिकेत असतो. तुम्ही कुठं नोकरी करता?’
अमेरिकन स्टाईलमध्ये शेखर उत्तरला, `शिकॅगोमध्ये.’
`किती वर्षं तुम्ही अमेरिकेत आहात?’
गिरीशच्या कन्नड प्रश्नांवर शेखर अमेरिकन इंग्लिशमध्ये उत्तर देत म्हणाला, `दहा वर्ष.’
`कुठल्या कंपनीत तुम्ही आहात?’
`वेस्टिंग हाऊस! आणखी काही प्रश्न आहेत?’ शेखरनं तीव्रपणे विचारलं.
`काही नाही-’ म्हणत गिरीश गप्प बसला; पण अपमान त्याला चांगलाच झोंबला.
सगळे उठले. गौरम्मांनी सांगितलं, `तुमचा अभिप्राय लवकर कळवलात तर बरं होईल. मला माझ्या सुनेला कळवावं लागेल. ती अमेरिकेहून येणार आहे लग्नासाठी!’
माना हलवत पाहुणे निघून गेले.
त्यांची पाठ वळताच गौरम्मा गिरीशवर करवादल्या, `एवढे प्रश्न कशाला विचारलेस रे तू? त्यांना आवडलं नाही ते! त्यांनी रागावून नकार दिला तर?’
`अम्मा, एवढ्या लांबच्या देशाला मुलीला देतोय आपण! कुत्र्याचं पिल्लू नव्हे! नोकरी कुठं करता म्हणून विचारलं तर त्यात राग येण्यासारखं काय आहे? फसलं जाऊ नये म्हणून मी विचारलं. काय चुकलं त्यात?’
`खरंय तुझं!’ शामण्णांनी त्याला पाठिंबा दिला.
`मला वाटतं, त्यांना आपली सुरभी पसंत पडेल! सुरभी, तुला काय वाटतं?’
`अम्मा, पण वय थोडं जास्त वाटतं नाही?’
`काही नाही! आठ वर्षांचं अंतर म्हणजे फार नाही. सगळं चांगलं आहे. आता तू काहीतरी खुसपट नको काढू! जमुनाला कळवायला पाहिजे-’
विनिता मुकाट्यानं पुढ्यातली कामं करत होती. तिला या संदर्भात कुणीही विचारलं नव्हतं. संसारात ज्याच्या मताला काहीही किंमत नाही, तो परकाच म्हणायचा! विनितेला तीव्रपणे वाटत होतं.
एवढ्यात गिरीशची हाक कानावर आली, `विनू, चल, एक चक्कर मारुन येऊ या. येताना भाजीही आणता येईल.’
`खरंच जाऊन ये, विनू! दिवसभर खूप दमलीस तूही काम करुन, त्यात दोन जीवांची! जा, मोकळ्या हवेत थोडी फिरुन ये.’ शामण्णांनी त्याला पुस्ती जोडली.
शामण्णांना विनिताच्या परिस्थितीची पूर्णपणे जाणीव होती. त्यांची तिच्यावर माया जडली होती.
घराबाहेर पडून थोडं अंतर चालल्यावर गिरीश म्हणाला, `काही म्हण विनू! आपल्या अपरिचित लोकांकडे सुरभीला द्यायची मला भीती वाटते. या शेखरविषयी आपल्याला कुठून माहिती मिळू शकेल?’
विनिताही विचारात पडली. मग म्हणाली, `तुमच्या भावाचे मदन नावाचे मित्र आहेत ना? त्यांच्या बहिणीलाही यांनी पाहिलं होतं म्हणे. लक्ष्मणरायांनीच तसं सांगितल्याचं मला आठवतंय. ती मुलगी पाहिलीय मी. देखणी आहे. का जमलं नाही कोण जाणे! चार पावलं असेच चालत गेलो तर त्यांचं घर लागतं. भेटून चौकशी करायची काय?’
गिरीशला हे पटलं.
दोघं मदनच्या घरी पोहोचले तेव्हा अनपेक्षितपणे मदनला पाहून चकित झाले. हा केव्हा आला अमेरिकेहून?
मदनचे वडील वयस्कर होते. त्यांच्यापुढे गिरीशनं शेखरविषयी सगळं सांगितलं. त्यानंतर चौकशी केली, `मुलगा कसा आहे? तुम्हाला काही कल्पना?’
`आम्हांला काही ठाऊक नाही रे! आमचं आणि त्यांचं मुहूर्ताच्या बाबतीत जमलं नाही. आम्ही कौल लावला तर डावा कौल लागला. म्हणून आम्ही नकार दिला.’
मदन त्या दोघांना गेटापर्यंत पोहोचवायला आला होता. त्यानं मात्र स्पष्टपणे सांगितलं, `गिरी, आमचे आप्पा आहेत जुन्या काळातले! हजार खोट्या गोष्टी सांगून एक लग्न जुळवावं यावर त्यांचा विश्वास आहे; पण मी हे मानत नाही. त्या वेळी डायव्होर्स नव्हते, आता सर्रास होतात. मला जे काही समजलं ते सांगतो. तुम्हांला त्यानंतर जो निर्णय घ्यायचा असेल तो घ्या. मला मात्र यात अडकवू नका.’
`काय सांग-’
`आम्ही दोघंही शिकागोमध्ये राहात होतो; पण परस्परांकडे कधी गेलो नव्हतो. पन्नास मैल अंतर दोघांच्या घरात होतं. एका रविवारी आपल्या भागातला मुलगा इथं आलाय म्हणून भेटायला गेलो. उगाच फॉर्‌मॅलिटी कशाला, असा विचार करुन फोन न करताच गेलो. घरात शेखर नव्हता. टूरवर गेला होता. घरात एक गोरी स्त्री होती. लग्नाशिवाय म्हणजे लिव्ह टुगेदर म्हणतात ना, तशी याच्याबरोबर राहात होती. दहा मिनिटं बसून जुजबी गप्पा मारुन आलो. गेली दोन वर्ष ते एकत्र राहात असल्याचंही समजलं. त्यामुळे मी हे लग्न ठरवायला विरोध केला.’
`असं झालं होय?’
`हं. आधी माझा विरोध बघून माझी बहीणच माझ्याबरोबर भांडायला उठली. मी अमेरिकेत यायला नको आहे म्हणून तू मोडता घालतोयस म्हणत राहिली. जेव्हा सारं सांगितलं तेव्हा कुठं गप्प बसली.’
मदनशी बोलल्यावर गिरीशला डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं झालं. दोघांनीही त्याचे मनापासून आभार मानत म्हटलं, `हे सांगून तुम्ही एक लग्न ठरवल्याइतकं पुण्य मिळवलंय! थँक्स!’
घरी परतताना दोघंही गप्पच होते. आता याविषयी बोलण्यासारखं काही राहिलंच नव्हतं.
रात्री जेवायला बसले होते तेव्हा गौरम्मांच्या मनात सुरभीचं लग्न कसं करून द्यायचं, हाच एक विषय होता. कार्यालय कुठलं सोयीचं होईल, पाहुण्यांची व्यवस्था कशी करायची, लग्नाला नातेवाईकांपैकी कुणाला बोलवायचं, कपडे कुठं घ्यायचे, सोनं-नाणं कुठं घ्यायचं, याविषयी बोलत होत्या; पण कुणीच त्यात सहभागी होत नव्हतं.
सगळं असह्य होऊन गिरीश उद्विग्नपणे म्हणाला, `अण्णा, एक सांगायचं आहे. या शेखरनं पसंती कळवली तरी तुम्ही संमती देऊ नका.’
`का?’ गौरम्मांनी चिडून विचारलं.
`मी शेखरची माहिती काढली आहे. त्याची एक गोरी मैत्रीण आहे असं समजलं.’
`आमचं बरं न बघवणाऱ्या कुणीतरी असूयेपोटी सांगितलं असेल.’
`अम्मा, आपल्याशी उत्तम संबंध असणाऱ्यांनीच सांगितलंय हे! रात्री पाहिलेल्या विहिरीत दिवसा का म्हणून पडायचं?’
शामण्णांनी विचारलं, `कुणी सांगितलं हे?’
घडलेली सारी घटना गिरीशनं सविस्तरपणे सांगितली आणि शेवटी म्हणाला, `माझी इच्छा मी सांगितली. यानंतर तुम्हांला जे करायचं आहे ते करा.’
एवढ्यात त्याला बाहेरुन कुणीतरी हाक मारली. गिरीश बाहेर निघून गेला.
आता सुरभीनं हुंदके देऊन रडायला सुरुवात केली. घरातलं वातावरण गंभीर झालं. विनिता रडणाऱ्या सुरभीशेजारी बसून म्हणाली, `सुरभी, अशी हताश होऊ नकोस. मीच तुझ्या भावाला घेऊन मदनरावांच्या घरी गेले होते. तुला यापेक्षा कितीतरी चांगला नवरा भेटेल. तू एवढा मनस्ताप करून घ्यायच्या लायकीचा तो मुलगा नाही!’
ठसठसणाऱ्या करटावर कढत पोटीस लावावं तसं झालं. निराशा आणि अपमान यामुळे उफाळलेला गौरम्मांचा संताप विनितेवर उसळला. मुलावरचाही संताप त्यात मिसळला.
सून गर्भारशी आहे याचं भान न ठेवता त्या उसळल्या, `तूच गिरीशला असलं काहीतरी शिकवतेस! एवढ्या खोलात शिरायचा त्याचा स्वभावच नाही. तूच मायावी जादूगारीण-’
विनिता थक्क झाली. दुखावून ती उद्गारली, `अम्मा, काय बोलता तुम्ही हे!’
यावर सुरभीही म्हणाली, `खरं बोलतेय अम्मा. मी अमेरिकेला जाऊ नये म्हणून तुम्हाला माझ्या लग्नात जितक्या अडचणी आणता येतील तितक्या तुम्ही आणताहात! तुम्हांला माझ्याविषयी असूया वाटते! मीही तुमच्यासारखं इथंच राब-राबून पैसा-पैसा साठवण्यात आयुष्य घालवावं अशी तुमची इच्छा आहे! उलट जमुनावहिनी किती मोठ्या मनाच्या आहेत! किती उदार आहेत! मी श्रीमंत होईन म्हणून तुम्हांला असूया वाटते. माझ्या अमेरिकेतल्या मुलाबरोबरच्या लग्नासाठी घर विकलं जाईल, अशी भीती वाटते म्हणून लग्न मोडताय तुम्ही! स्वार्थी!’
शांत स्वभावाचे शामण्णा खवळून ओरडले, `तोंड बंद कर, सुरभी!’
सुरभी त्यांनाही म्हणाली, `अण्णा, तुम्ही पांढरं आहे ते सारं दूधच समजता. त्यांच्या मनातले कुटील हेतू तुम्हांला समजणार नाहीत. म्हणूनच म्हणतात, कुळगोत्रा बघून मुलगी घरी आणावी. मोठ्या घरातून आलेल्या जमुनावहिनी मोठ्या मनाच्या आहेत! किती उदार स्वभाव आहे त्यांचा!’
शामण्णा हात उगारत म्हणाले, `सुरभी, जीभ आवरती घे!’
विनितेला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं. आपल्यावर कधी-काळी असा आरोप करण्यात येईल, हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. तिनं शामण्णांना आवरलं. डोळ्यांमधलं पाणी तिच्या दोन्ही गालांवरन ओघळलं. ते पुसायचंही विनिताला भान नव्हतं. भरल्या ताटातल्या अन्नात ते अश्रू मिसळून गेले.
`सुरभी, तुला काया-वाचा-मनानं बहीण मानून मी तुझ्या लग्नाच्या संदर्भात लक्ष घातलं. यानंतर तुमच्या घरातल्या कुठल्याही बाबतीत मी लक्ष घालणार नाही. मला क्षमा करा!’ एवढं म्हणून जेवण अर्धवट टाकून विनिता आत निघून गेली.
अस्वस्थ शामण्णांच्या हातातला घास तसाच राहिला.
पण सुरभी आणि गौरम्मा मात्र गर्भारशी विनिता अर्धपोटी उठून गेली, याची फिकीर न करता जेवत होत्या.
डॉलरनं सर्वप्रथम त्या घरात आपलं अशांत पाऊल टाकलं होतं.
सुरभीचं लग्न ठरलं. मुलगा हैद्राबादमध्ये बँकेत नोकरी करत होता. सुरेश त्याचं नाव. ऑफिसर होता. घरची कुठलीही जबाबदारी त्याच्यावर नव्हती. एकुलत्या एक बहिणीचं लग्न झालं होतं. घरात सासू नव्हती. सुरभी नशीबवानच म्हणायची! स्वत:चं घर होतं. वडील होते. घरची गाडी होती. अमेरिकेतली नोकरी नाही एवढं सोडलं तर काहीही खटकण्यासारखं नव्हतं.
विनितेनं मात्र लग्नाच्या संदर्भात कुठल्याही बाबतीत लक्ष घातलं नव्हतं. सुरभीच्या कठोर बोलण्यानंतर विनिताही `किती केलं तरी बहीण ती बहीणच आणि नणंद ती नणंदच’ या विचारावर येऊन ठेपली होती.
सासू आणि नणंदेच्या स्वभावाचा परिचय त्याच प्रसंगी झाला होता. त्यांच्या स्वार्थी स्वभावाचा नीच आविष्कार पाहताच विनिता अंतर्मुख झाली होती. तिची कुणाशीही बोलण्याची इच्छाच निघून गेली होती.
गिरीशचा मुळातला स्वभाव अबोल होता त्यात नाही म्हटलं तरी सुरभी त्याची रक्ताची बहीण होती. त्यामुळे तो त्या घटनेतून सहज बाहेर येऊ शकला होता.
सुरुवातीपासूनच अशा घटना हृदयात दडवून जगण्याची सवय असलेल्या विनितेनंही दु:ख अंतर्मनात दडवलं आणि अलिप्तपणे वावरु लागली.
या सर्व प्रकारात खऱ्या वेदना झाल्या त्या शामण्णांना! त्यांच्या नंदगोकुळा सारख्या संसारात अदृश्य का होईना, पण भेग पडली होती. डॉलरनं ती पाडली होती!
सुरभीच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती.
चंद्रूनं सूटचं कापड पाठवलं होतं, तर जमुनेनं सुरभीला शंभर डॉलर्स पाठवून दिले. सोबत चंद्रूचं पत्र होतं-
`आम्हांला यंदा रजा कमी आहे. जमुनाही बँकेत नोकरी करते. त्यामुळे लग्नाची तारीख ठरताच लगेच कळवा, म्हणजे दोन आठवडे आधी येता येईल. शक्यतो सगळ्यांना सोयीचा दिवस ठरवा.’
ऑगस्ट महिन्यात विनितेच्या बाळंतपणाचे दिवस येत होते. त्यानंतर, म्हणजे डिसेंबर महिन्यात लग्नाचा मुहूर्त ठेवणं शक्य होतं. पण त्यासाठी पाहुणे तयार नव्हते.
विनितानं आपलं बाळंतपण धारवाडमध्ये करुन घ्यायचं ठरवलं होतं. गिरीश आणि शामण्णांनी तिला नाना परीनं समजावलं तरी ती आपल्या विचारावर ठाम होती. त्या दोघांनाही तिनं समजावलं, `आमच्या गावात किती तरी दवाखाने आहेत. माझ्या आजी बाळंतपण करायला येतील. मी बाळंतपणासाठी धारवाडच्या माझ्या घरी जाईन. कमलापुरांचा दवाखाना घरापासून खूप जवळ आहे.’
जुलै महिन्यात मुहूर्त पाहणं सगळ्यांच्या सोयीचं होतं. घरी फोन होता. मुहूर्ताची बातमी फोन करुन जमुनेला सांगितली.
बातमी ऐकताच तिनं सांगितलं, `आम्ही जुलै महिन्यात युरोपच्या प्रवासाला जाणार आहोत. तो प्रवास कॅन्सल करणं शक्य नाही.’
हे पैशाचं युद्ध! डॉलरविरुद्ध रुपयाचं युद्ध!
तिनं स्पष्टच सांगितलं, `मी यायला हवं असेल, तर माझ्या सोयीनं लग्नाची तारीख ठरवा! विनिता येणं आवश्यक असेल, तर तिच्या सोयीनं ठरवा!’
शामण्णांनी समजावलं, `गौरी, बाळंतपणाची तारीख मागं-पुढं करणं कुणाच्याही हातात नाही. आपण विनिताच्या सोयीनंच तारीख ठरवू या. जमुनेनं या वर्षी युरोप-प्रवास केला नाही, तर काय बिघडणार आहे? पुढच्या वर्षी ते जाऊ शकतात. एकच बहीण आहे. आठ दिवस सुट्टी मिळाली तरी येऊन जाऊ दे त्यांना.’
`तसं नाही हो! जमुना रागावली आणि लग्नालाच आली नाही तर काय करायचं? तिला जे सोयीचं असेल, तसंच आपण केलं पाहिजे. तुम्हा पुरुषांना यातलं काही समजत नाही. तुम्ही नका इकडे लक्ष देऊ!’
पण विनितेला सारा अर्थ समजला होता.
सुरभीच्या लग्नासाठी चंद्रूनं दोन लाख रुपये दिले होते. गिरीशनंही बँकेतून कर्ज काढून पन्नास हजार रुपये दिले होते. चंद्रूनं अधिक पैसे दिले असल्यामुळे त्याला जे सोयीचं असेल, तसंच असा गौरम्मांचा निर्णय दिसत होता. म्हणजेच जमुना जे म्हणेल, तेच ऐकण्यात येणार हे नक्की होतं. वयामुळे प्रौढत्व आलं असलं, तरी डॉलरच्या नादामुळे गौरम्माही जमुनेमागे पोरकटपणे धावत होत्या.
अशा प्रकारे सुरभीचं लग्न ऑगस्ट महिन्यातच ठरलं. अगदी विनितेच्या बाळंतपणाच्या दिवसांजवळचाच मुहूर्त ठेवला गेला. हे ठरवत असतानाच `तू आलीस किंवा नाही आलीस तरी हरकत नाही, जमुना येणार आहे’ हे दाखवून देण्यात येत होतं.
`जमुना माझी थोरली सून. अमेरिकेत असते. सावकार कृष्णप्पा ठाऊक आहेत ना? त्यांची मुलगी!’ असं लग्नघरात अभिमानानं सांगता येईल. विनितेविषयी काय सांगणार?
येताना जमुना भरपूर भेटवस्तू घेऊन येईल, असंही त्यामागं गणित होतं.
विनिताचा बाळंतपणासाठी धारवाडला जाण्याचा दिवस ठरला. शामण्णा अस्वस्थ होऊन आत-बाहेर करत होते. अधून-मधून तिला म्हणत होते, `सगळी नीट तयारी आहे ना? तू अजिबात चिंता करू नकोस, विनू! सगळं नीट होईल!’
त्यांच्या वागण्यातून व्यक्त होणारी काळजी पाहून विनिता म्हणाली, `अण्णा, आमचं धारवाड म्हणजे काही खेडं नाही. आजूबाजूला माणसं आहेत. माझीही बागेच्यामध्ये झाडा-झुडपांनी घेरलेल्या घरात राहायची इच्छा आहे. काळजी करण्यासारखं काही नाहीच.’
गौरम्मा मात्र प्रथमच फणकारुन म्हणाल्या, `कुठलं धारवाड कोण जाणे! तिथंच बाळंतपण व्हावं म्हणून हट्ट करतेय! इथं आम्ही नाही का करणार बाळंतपण?’
सारं तोंडदेखलंच असल्याचं ठाऊक असल्यामुळे विनिताही त्यांच्याशी वाद घालायला जात नव्हती.
चंद्रू आणि जमुना भारतात आले. त्याच दिवशी विनितेला मुलगा झाला. शामण्णांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. मुलगा-सून आल्यामुळे गौरम्मांनाही नवतारुण्य आलं होतं.
लग्नाला अजून पंधरा दिवस होते.
जमुनेनं कुठल्याही कामाची जबाबदारी अंगावर घेतली नाही. प्रकृतीचं निमित्त सांगून ती आईच्या घरी निघून गेली आणि लग्नाआधी केवळ दोन दिवस परतली.
लग्नघरातही दर पाच मिनिटाला एक रेशमी साडी बदलून जमुना व्हिडिओ कॅमेऱ्यापुढे मिरवत राहिली. फिरुन-मिरवून ती इतकी थकली की विचारता सोय नाही!
काही का असेना, सुरभीचं लग्न मात्र थाटात झालं. मुलीला दोन किलो चांदी, भरपूर सोनं, रेशमी साड्या, घरासाठी लागणारं आधुनिक सामान, कॅन वगैरे सारं गौरम्मांनी दिलं.
adeswal
Expert Member
Posts: 3283
Joined: Sat Aug 18, 2018 4:09 pm

Re: Romance डॉलर बहू

Post by adeswal »

जमुनेला गौरम्मांचा हा उधळेपणा अजिबात आवडला नाही. आपण दूर अमेरिकेत थंडी-बर्फात कामं करुन आणि काटकसर करुन साठवलेले डॉलर्स अशा फालतू कारणांसाठी खर्च करायचे? जे मिळवतात, त्यांनाच पैशाचं महत्त्व ठाऊक असतं!
तरीही तोंडानं वाईट बोलून वाईटपणा घेण्याइतकी ती कच्ची नव्हती. यावरचा मार्ग सोपा होता. यानंतर डॉलर्स पाठवणं कमी करायचं! एवढंच.
गिरीश बाळाला बघण्यासाठी लगोलग जाऊन आला होता.
त्यानं आणि विनितानं बाळासाठी `हर्ष’ नाव चांगलं आहे असं योजून ठेवलं. कारण ती शामण्णांची इच्छा होती.
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सुरभी हैद्राबादला गेली. लगेच चंद्रू, विनिता आणि बाळाला बघायला धारवाडला निघाला. जमुना माहेरी गेली.
लग्नघरातली कामं शिल्लक असल्यामुळे गौरम्मा धारवाडला आल्या नाहीत. लग्नघरात आणि इतरही वेळी प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीला त्यांनी सुनावलं, `आमच्या जमुनेनं चार हजार डॉलर दिले लग्नासाठी! नाहीतर लग्न होणंच शक्य नव्हतं! खरं तर कन्यादानाचं सारं पुण्य जमुनेला मिळायला पाहिजे!’
त्यात कुठंही गिरीशचं नाव नव्हतं.
चंद्रूच्या तीक्ष्ण बुद्धीला मात्र घरातल्या वातावरणामधला बदल लक्षात आला होता. या घराला आपलं घर समजून एवढी वर्षं राबणारी विनिता सुरभीच्या लग्नाच्या वेळीच माहेरी बाळंतपणासाठी गेली होती.
अण्णांचा चेहरा कष्टी होता.
लग्नघराच्या धामधुमीत गौरम्मा किंवा सुरभीच्या तोंडून एकदाही `विनिता असायला हवी होती. विनिता असती, तर बरं झालं असतं.’- अशा प्रकारचं एकही वाक्य ऐकू आलं नव्हतं. गिरीशबरोबर कुणी बाळासाठी कपडे किंवा बाळलेणी पाठवली नव्हती.
आपल्या सुंदर आणि शांत घरात ही अशांतीची वावटळ कुठून आली असेल? याला जबाबदार कोण?
मी? की जमुना? चंद्रू गोंधळून गेला होता.
आठ वर्षांनंतर चंद्रू धारवाडला येत होता.
या आठ वर्षांमध्ये किती तरी घडून गेलं होतं!
त्या वेळी जो चंद्रू धडधडत्या अंत:करणानं या गावी आला होता, तोच चंद्रू आत्मविश्वासासह इथं येत होता.
त्या वेळी रेल्वेमध्ये ज्या विनितेनं आपल्या मधुर गाण्यानं त्याचं लक्ष वेधून घेतलं होतं, तीच विनिता आता त्याची भावजय झाली होती.
त्या वेळी `सेकंड क्लासचा बर्थ मिळाला तर नशीब’ मानणारा चंद्रू आता फर्स्ट क्लासच, काय विमानानं प्रवास करायलाही कंटाळून गेला होता.
त्या वेळी अमेरिकाच आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे असं मानणारा चंद्रू आता म्हणत होता, `तोही एक श्रीमंत देश आहे, एवढंच-’
त्या वेळी त्याचं भूगोलाचं ज्ञान मैसूर-मंड्य एवढ्यापुरतंच मर्यादित होतं. आता मात्र सारं जग त्यात सामावलं होतं.
याचबरोबर या खेपेच्या प्रवासात त्यानं एक महत्त्वाचं सत्य जाणलं होतं-
डॉलरच्या रुपानं धन कमावत असल्यामुळे सगळे आपल्याला आज मान देताहेत, आत्मीयता दाखवताहेत, हेवाही करताहेत. पण खरं प्रेम आणि खरा विश्वास आपण गमावला आहे.
कितीही पैसा मिळवला तरी प्रेम-विश्वास मिळत नाही. उलट पैशाच्या भरतीमध्ये अशा नाजूक भावना मरण पावतात.
या खेपेला चंद्रू धारवाडमधल्या एका हॉटेलमध्ये उतरला होता. एवढ्या वर्षांमध्ये धारवाडही बरंच बदललं होतं. रस्त्यावरची गर्दी आणि रिक्षांची संख्या वाढली होती. ज्या `अत्तीकोळ्ळ’ भागात पूर्वी काहीही नव्हतं, तिथंही आता घरं झाली होती. रस्त्यात दिसणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांच्या वेशभूषेतही बरीच आधुनिकता आली होती.
चंद्रू विनितेला भेटायला तिच्या घरी गेला.
त्या घराच्या भोवताली मात्र फारसा फरक झाला नव्हता. भोवतालच्या बागेचा तजेला मात्र पूर्वीसारखा राहिला नव्हता. तेही साहजिक होतं म्हणा! त्या झाडांना वेळच्या वेळी पाणी मिळण्याची व्यवस्था केली असती, तरी विनितेची माया आणि प्रेम नसेल तर तजेला कसा येणार?
चंद्रूला पाहून विनिता मात्र आश्चर्यचकित झाली. आपल्या बाळाला बघायला चंद्रू एवढ्या लांब आवर्जून येईल अशी तिनं स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती.
तिची आजी सीतक्का चंद्रूजवळ बसल्या. निरखून बघत `अरे, चंद्रू ना तू? कसा आहेस? बरा आहेस ना?’ वगैरे चौकशी केली.
`होय. तुम्ही कशा आहात?’ त्यानंही चौकशी केली.
एवढ्यात विनिता खोलीबाहेर आली.
`लग्न कसं झालं? अण्णा कसे आहेत?’ तिनंही चौकशी केली.
`सगळे छान आहेत. बाळाला दाखवणार नाही?’
विनितेच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद उमटला. त्या नव्या मातेनं कौतुकानं छोटा गोमटेश्र्वर त्याच्यापुढे धरला. नवजात बालक कुणासारखं आहे यावर कौतुकाची चर्चा झाली, पण काहीच निष्कर्ष निघाला नाही.
त्यानंतर चंद्रू मोकळेपणानं गप्पा मारु लागला.
मध्येच काही तरी आठवून त्यानं विचारलं, `तुम्हाला अजून ते गाणं येतं?’
`कुठलं?’
`वसंत-बनी ती गाते कोकिळ–’
`न यायला काय झालं?’
`तुम्ही अजूनही गाता?’
काही क्षण मौनात गेले. त्यानंतर त्याच्याकडे पाहत विनितेनं सांगितलं, `भोवतालच्या परिस्थितीमुळे कोकिळेचं गाणं मूक झालंय!’
`का? असं का व्हावं? कोकिळेला राजदंडाचं भय नसतं आणि राजमुद्रेची आशाही नसते. राजमुद्रेच्या भयानं गाणं बंद केलं?’
`कुठला राजा आणि कुठला आम्रवृक्ष! सगळी झाडं नष्ट झाली, सिमेंटचे इमले उठले, पैशाचं महत्त्व शिगेला पोहोचलं! आता कशी कोकिळा गाणं म्हणेल? आणि ते ऐकणार तरी कोण?’
`असं का म्हणता? पैसे मिळवण्यासाठी नोकरी धरल्यावर गाणं सोडूनच द्यावं असं तुम्ही मानता का?’
`पैसे? अंहं डॉलर!’ बोलता-बोलता विनिता गप्प झाली.
तिच्या मौनाचा अर्थ चंद्रूलाही समजला होता.
`विनिता, मलाही अतिशय निराशा वाटते.’
`तुम्हाला? तुम्हीच असे म्हणालात तर आमच्यासारख्यांची काय गत? तुम्ही एवढे श्रीमंत! जमुना तर साक्षात लक्ष्मीच! सतत तुमच्या नावाचा जप करणारी आई आणि बहीण! काय कमी आहे तुम्हाला?’
`विनिता, उलट तुम्हालाच मी म्हणतो, काय झालंय? तुम्ही तुमच्या माणसांमध्ये आहात. कानावर तुमची भाषा सतत येते. तुमच्या मुलावर तुम्ही तुमचे संस्कार करु शकता. तुम्हाला माझ्यासारखं दुहेरी जीवन तर जगावं लागत नाही ना!’
`नदीपलीकडचं कुरण नेहमीच हिरवंगार दिसत असतं!’
`हेच बोलणं तुम्हालाही लागू पडत नाही काय?’
तिला चंद्रूच्या बोलण्याचा अर्थ समजेना. आपल्याला वाटतं तसा चंद्रू तिथं सुखी नाही असं दिसतं. म्हणजे त्या अमेरिकेतही दु:खी माणसं असतात तर!
`विनिता, तुम्हाला तिथल्या जीवनाची कल्पना नाही. सेलमध्ये खरेदी करायची आणि डॉलरला चाळीसनं गुणायचं! असं जगणारी मंडळी सुखी असतात काय? तिथं हजार डॉलर्समध्ये सामान्य काम करत राहायचं आणि इथं येऊन आपल्याला चाळीस हजार रुपये पगार मिळतो असं सांगून भाव खायचा- हे योग्य आहे काय? तिथल्या दु:खांचा उल्लेखही न करता इथं कुबेराप्रमाणे वागणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका.’
चंद्रूला जमुनाविषयी काही सुचवायचं असेल काय?
`विनिता, तिथं डॉलर मिळवण्यासाठी आम्ही आपली माणसं, घर-दार सगळं सोडून कष्ट करत राहतो. तिथं केवळ भारतीय माणसांबरोबर मिसळतो. तिथल्या समाजाचा अविभाज्य अंग होऊ शकत नाही. कितीही वर्षं तिथं राहिलं तरी एक प्रकारचा जीवघेणा एकटेपणा आम्हांला छळत राहतो. त्यासाठी आम्ही तिथं अनेक देवळं आणि मठ स्थापन करतो.’
चंद्रूचं बोलणं ऐकून अस्वस्थ झालेली विनिता कळवळून म्हणाली, `मग तिथं का राहता? इथं का निघून येत नाही?’
`पैशाच्या दलदलीत आणि मोहाच्या जाळ्यात सापडलोय आम्ही! आमच्या लायकीपेक्षा फार उत्तम नोकरी तिथं मिळते. जाती, भाषा, प्रदेशाचं राजकारण नाही. सुखानं आपलं काम आपण करु शकतो. इथं आलो तरी तशी नोकरी मिळणार नाही. देहालाही तिथल्या सुखासीन जीवनाची सवय झाली आहे. माझंच पाहा ना! एकेकाळी कसा जगत होतो- आता गाडी नसेल, तर घराबाहेर पडायला मी तयार नसतो. तिथलं सगळं सोडून मी इथं आलो तर आणखी दु:खी होईन.’
प्रथमच चंद्रू विनितेशी अंतर्मनातल्या सुख-दु:खाविषयी बोलला होता. तिच्या स्नेहमय स्वभावाची त्याला याच धारवाडमध्ये ओळख झाली होती. तिनं कधीही त्याचं मूल्यमापन डॉलरच्या पार्श्र्वभूमीवर केलं नव्हतं.
त्यानं विचारलं, `विनिता, तुम्हीही पहिल्यासारख्या उत्साही आणि आनंदी राहिला नाहीत. का बरं?’
`खरं सांगू? तुम्हाला राग नाही ना येणार? तुमच्या आई-बहिणीला दोष दिला तर चालेल?’
`खरं तेच सांगा.’
`तुमच्या डॉलरनं आपल्या घरचा सत्यानाश केला आहे. आम्ही काहीही केलं, कितीही केलं तरी अम्मा त्याची तुलना डॉलरशी करतात. सुरभीच्या लग्नासाठी आम्ही दोघांनाही कर्ज काढून पैसे उभे केले. शारिरीक कष्टही भरपूर घेतले. तरीही तिच्या लग्नाची तारीख ठरवताना त्यांनी केवळ जमुनेची सोय पाहिली.आपल्याबरोबर गेली चार वर्षे असलेल्या सुनेची त्यांना आठवणही आली नाही. डॉलर-सुनेचं महत्त्व त्यांना अधिक वाटलं!’
चंद्रू तिचं बोलणं ऐकत होता.
`आताही माझी खात्री आहे. लग्नघरात त्या जमुनेच्या कृपेमुळे लग्न झालं असंच म्हणाल्या असतील. माझं नावही त्यांनी काढलं नसेल!’
चंद्रूला आश्चर्य वाटलं. धारवाडच्या एका कोपऱ्यात असलेल्या बाळंतीण विनितेला ही कसली दृष्टी आहे म्हणायची? ही दृष्टी नाही- विनितेच्या इतक्या वर्षांच्या अनुभवातून उमटलेले ते शब्द होते.
खंतावलेला चंद्रू बेंगळूरला परतला.
हर्षला घेऊन विनिता बेंगळूरला आल्याला सहा महिने उलटून गेले होते. आता हर्ष पालथा पडून रांगायचा प्रयत्न करत होता. घरात त्याचा एकसारखा काही ना काही गोंधळ सुरु असे. आजोबांचा तर त्याला इतका लळा लागला होता की शामण्णांचा आवाज ऐकला की त्यांच्याकडे झेप घ्यायचा. आजोबा-नातवाची चांगलीच मैत्री जुळली होती.
आता घरात माणसंही बेताची होती. सुरभी अधून-मधून येत होती. तिचं सासरचं जीवन आनंदात चाललं होतं. पाहुणे मंडळी मात्र अगदी खास होती. कृष्णप्पा सावकारही अलीकडे त्यांच्या घराकडे फिरकत नव्हते. कारणही ठाऊक नव्हतं.
त्या दिवशी गौरम्मा दोशाचं पीठ रुबत होत्या. एकाएकी त्यांच्या छातीचा भाग दुखू लागला. कसला तरी मार बसला असावा एवढाच त्यांनी विचार केला आणि तिकडे फारसं लक्ष दिलं नाही. दुसऱ्या दिवशी अंघोळीच्या वेळी त्यांनी चाचपून पाहिलं- एखादी गाठ असावी, असं काहीतरी त्यांच्या हाताला लागलं. मिठाचा शेक दिला तर गळू फुटून जाईल असा विचार करुन त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं.
आठवडा गेला तरी गाठ जशीच्या तशीच होती. ते पाहून मात्र गौरम्मा थोड्या घाबरल्या. सकाळी शाळेला जायच्या घाईत असलेल्या विनितेला त्यांनी बोलावून ती गाठ दाखवली.
विनितेनं लगेच रजा टाकली आणि डॉक्टरांकडे त्यांना घेऊन जाण्याची तयारी केली. विनितेला गांभीर्य समजलं असलं, तरी तिनं याविषयी नवरा किंवा सासऱ्यांना सांगितलं नाही.
अगदी घराबाहेर पडताना तिनं शामण्णांना सांगितलं, `आम्ही थोड्या डॉक्टरांकडे जाऊन येतो हं! काही काळजी करू नका.’
डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली आणि गौरम्मांना बाहेर बसायला सांगितलं. नंतर त्यांनी विनिताला विचारलं, `त्यांच्याशी तुमचं काय नातं आहे?’
`माझ्या सासूबाई आहेत. काय झालंय त्यांना?’
`त्यांच्या ब्रेस्टमध्ये गाठ आहे. बायप्सी करुन तपासलं पाहिजे. त्यानंतर काय ते कळेल.’
`म्हणजे? फार त्रास होईल त्यांना?’
`फार नाही. त्या गाठीची तपासणी अत्यावश्यक आहे. कॅन्सर असेल किंवा नसेलही. पण खात्री करून घेतली पाहिजे. शक्य तितक्या लवकर. तुम्ही त्यांना एवढ्यात काहीच सांगू नका.’
विनिता जड मनानं बाहेर आली. तिला पाहताच गौरम्मा म्हणाल्या, `काही नाही ना? काही क्रीम लावायला दिलं की नाही?’
`नाही. लवकर गुण येईल म्हणे!’ विनिता पटकन म्हणाली.
विनिता विचारात पडली. शामण्णा वयस्कर म्हणून त्यांना सांगायचं नाही, लांब राहणाऱ्या चंद्रूला उगाच का चिंता, म्हणून त्याला सांगायचं नाही. सुरभीला प्रसंगाचं गांभीर्यच कमी, म्हणून तिला कळवायचं नाही.
रात्री तिनं गौरम्मांच्या छातीतल्या गाठीविषयी गिरीशच्या कानावर घातलं. ते ऐकताच भावनाप्रधान गिरीशचे डोळे पाण्यानं भरले.
`डॉक्टर काय म्हणाले? कॅन्सर?’
विनितेनंच त्याला समजावलं, `तसं काहीही डॉक्टरांनी सांगितलेलं नाही. आता छोटंसं ऑपरेशन करुन ते गाठ काढून टाकणार आहेत, एवढंच. कॅन्सर नसण्याचीही शक्यता आहेच ना?’
दुसऱ्या दिवशीही विनिताच गौरम्मांना दवाखान्यात घेऊन गेली. आता मात्र गौरम्माही गंभीर झाल्या. आपल्याला काहीतरी झालं आहे. सून सांगायला तयार नाही. मुलगा मात्र घाबरलाय हे त्यांच्या लक्षात आलं.
सुनेच्या मनोधैर्याचं क्षणभर त्यांनाही कौतुक वाटलं. तेवढंच.
आपल्याला काही झालं तर सुरभीचं काय होईल?
याआधी त्यांच्यावर दवाखान्यात जायचा प्रसंग आला नव्हता. त्यामुळे दवाखाना म्हटल्यावर त्यांना भीती वाटली होती. त्यात ऑपरेशन!
विनिता मात्र सावधपणे त्यांना सांगत होती, `अम्मा, ही छोटीशी गाठ आहे, ती काढून टाकणार आहेत. मी इथंच बाहेर आहे. तुम्ही अजिबात घाबरायचं कारण नाही. मी कौल लावून विचारलंय- सगळं चांगलं होईल म्हणून कौल मिळालाय!’
तिचं समजुतीचं बोलणं ऐकताना गौरम्मा संकोचून गेल्या होत्या.
नंतरही एक-दोन दिवस त्यांना दवाखान्यात राहावं लागलं. स्त्रियांचा वॉर्ड असल्यामुळे रात्री विनिताच तिथं राहत होती. वांतीची भावना झाली की तीच पॅन देत होती. बाकीही हवं-नको पाहत होती. कशाचाही कंटाळा करत नव्हती.
वॉर्डमधल्या आजूबाजूच्या आया-बाया सकाळी म्हणायच्या, `किती चांगली आहे तुमची मुलगी! संपूर्ण रात्रभर जागी असते! तुमचं सगळं कशी नीट करते.’
`माझी मुलगी हैद्राबादला असते. ही माझी सून! आणखी एक सून आहे. दूर अमेरिकेत राहते ना, म्हणून आली नाही.’
दुखण्यातही रुपयापेक्षा डॉलरचाच मोह त्यांच्यावर प्रभाव पाडून होता.
जेव्हा रिपोर्टमध्येही कॅन्सर नसल्याचं समजलं, तेव्हा गिरीश आणि विनितेला फार आनंद झाला. गिरीशनं प्रथमच चंद्रूला सविस्तरपणे पत्र लिहिलं.
आठवडाभर गौरम्मांचं ड्रेसिंग आणि विश्रांती चालली होती. त्याआधी दोन महिने गिरीशनं मंगळूर-उडपी-कारवार-गोकर्ण अशी समुद्रकिनाऱ्याची गावे पाहण्यासाठी ट्रीप ठरवली होती.
हॉस्पिटलमधून घरी आल्यावर शामण्णांनी सांगितलं, `तुम्ही ठरवल्याप्रमाणे जाऊन या. मी घरात असतोच. मी पाहीन तिच्याकडे.’
पण विनितेनं ते मानलं नाही. तिनं सांगितलं, `गोकर्ण-उडुपी कुठं पळून जात नाहीत. पुढच्या वर्षीही हवं तर जाता येईल.’
`हे पाहा, एवढ्यात जमुना येणार आहे असं पार्वतम्मा सांगत होत्या. त्यांच्या नात्यातलं कुणाचं तरी लग्न आहे म्हणे. मला बरं नाही म्हणून तुम्ही तिला कळवा- ती धावत येईल आणि आठवडाभर इथं राहील. सुरभीलाही बोलावून घेईन. तिलाही जमुनेबरोबर राहिल्यासारखं होईल. तुम्ही दोघंही खुशाल जाऊन या!’ गौरम्मा म्हणाल्या.
हे ऐकून शामण्णांची मान खाली गेली.
आपल्या युरोपच्या ट्रीपसाठी जमुनेनं सुरभीचं लग्न पुढे ढकलायला लावलं होतं! विनितेला वाटलं, आपणच अयशस्वी आहोत. किती केलं तरी आपण यांना त्या डॉलर-सुनेपासून दूर नेऊ शकत नाही. ऑपरेशनची जखम सुकण्याआधीच यांना आपला विसरही पडला.
अखेर जे व्हायचं तेच झालं म्हणा!
जमुना काही आली नाही. विनिता मात्र ट्रीप रहित करुन घरातच राहिली.
चंद्रूनं पत्राचं उत्तर पाठवलं. त्यात तीनशे डॉलर्सचा चेक होता. शिवाय त्यानं लिहिलं होतं-
`पैशानं मदत करणं तसं सोपं असतं. पैसे पाठवता येतात. पण जे शारीरिक मदत करतात, त्यांना मात्र विसरता कामा नये. प्रेम आणि विश्वास केवळ धनानं विकत घेणं अशक्य आहे.’
पत्र कचऱ्याच्या टोपलीत पडलं आणि चेक बँकेत रवाना झाला.
ऑफिसच्या कामानिमित्त चंद्रू बेंगळूरला आला. त्याला भेटण्यासाठी सुरेश आणि सुरभी आले होते. चंद्रूनं बातमी आणली- जमुनेला दिवस राहिले होते.
समोर खेळणाऱ्या नातवापेक्षा गौरम्मा अमेरिकेतल्या न जन्मलेल्या नातवाची अधिक चिंता करु लागल्या. त्या कौतुकानं चौकशी करु लागल्या, `जमुना कशी आहे रे? केव्हा बाळंतपण तिचं? लोणचं घेऊन जाशील काय? आणखी कसले डोहाळे लागले आहेत तिला?’
समोर गोंडस हर्ष खेळत होता, आजोबांशी लडिवाळपणे बोबड्या शब्दांत गप्पा मारत होता. दिसायला तर विनितेसारखाच लोभस दिसत होता; पण विनिता मात्र कोमेजून गेली होती. बाळंतपणात धारवाडमध्ये दिसत होती, त्यापेक्षाही रोडावली होती ती. चेहऱ्यावर पहिल्यासारखी तरतरीही दिसत नव्हती. तिला कशातही फारसा रस राहिला नव्हता. यांत्रिकपणे तिची कामं चालली होती.
त्यानं अगदी प्रथम धारवाडमध्ये ज्या विनितेला पाहिलं होतं, ती ही नव्हतीच!
गौरम्मा तर तिच्याशी कारणाशिवाय एक शब्दही बोलत नव्हत्या. स्नेहाचा एकही धागा तिथं दिसत नव्हता. डॉलरच्या दगडाखाली तो पूर्णपणे नष्ट होऊन गेला होता.

Return to “Marathi Stories”