विसरू कशी....
नेहमीप्रमाणे आपल्या बंगल्याच्या बाल्कनीत ती फुलझाडांना पाणी घालत होती. लग्न झाल्यापासून तिच्या जीवनात हाच काय तो विरंगुळा होता. आजूबाजूची बाग फुलविणे आणि फक्त मोबाईलवर तेही फक्त मैत्रिणींशी गप्पा मारणे. तिच्या कोमल नाजूक चेहऱ्यावर उगाचच प्रौढत्वाच्या खुणा दिसू लागल्या होत्या! डोळ्याभोवती काळी वर्तुळे वरवर अधिकच गडद होऊ लागली होती. मन उदास असलं की सौंदर्याला आपोआप उतरत्या कळा लागतात. एक अवखळ अल्लड मुलगी दोन तीन वर्षात अगदी वयस्कर वाटू लागली होती. सगळी भौतिक सुखं तिच्या पायाशी लोळण घेत होती. पण पोपटाला पिंजरा लोखंडाचा असला काय किंवा सोन्याचा असला काय, शेवटी तो पिंजराच!! अनेकदा अगदी आत्महत्यांचे विचारही तिच्या डोक्यात येत पण मागे आता एक मुलगी होती. दिवसेंदिवस तिची घुसमट वाढतच चालली होती. दिवसभर तासन्तास ती स्वतःचा भूतकाळ आठवत स्वतःच्या नशिबाला दोष देत बागेतील कोपऱ्यातल्या झोपाळ्यावर बसून राही. आख्खा गाव वहिनीसाहेब म्हणून तिच्यासमोर मान झुकवत असे पण तिला त्याचं काहीच नव्हतं. हातपाय कापून एका खोलीत टाकलेल्या धडासारखं तीच जिणं होतं. सगळ्या झाडांना पाणी घालून झाल्यानंतर ती तिच्या झोपाळ्यावर येऊन बसली आणि नेहमीप्रमाणे विचारात बुडून गेली.
कोमल आपटे! ज्युनियर कॉलेजातली सगळ्यात अवखळ आणि खोडकर मुलगी. तिला शांत बसणं कधी माहितीच नव्हतं. अगदी बिनधास्त आणि बेधडक! सगळे तिला भिंगरीच म्हणायचे. दिसायला तशी बरी. नाजूक चेहरा, बारीक अंगकाठी, नावसारखाच कोमल आवाज! तिच्या दिसण्यामुळे नाही पण तिच्या वागण्या बोलण्याने ती कुणालाही प्रेमात पाडेल अशीच. वर्गातील डझन दोन डझन पोरं तिच्या मागे भिरभिरायची. पण त्यांच्या हाती लागेल ती भिंगरी कसली. ती त्यांच्या फिरक्या घेत ते भिरभिरतच राहतील याची पुरेपूर काळजी घ्यायची. तिचे वडील अण्णा आपटे त्याच शाळेत क्लार्क होते. एक दिवस कुणाची तरी दृष्ट लागली आणि गावचे पुढारी अप्पासाहेब धनावडेंचा मुलगा उदयसिंहांची नजर तिच्यावर पडली.
एके दिवशी अचानक अप्पासाहेबांचा एक माणूस घरी निरोप घेऊन आला. 'अप्पासाहेबांनी ताबडतोब बंगल्यावर बोलावलं आहे!' तिच्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. एखाद्याला उभ्या उभ्या जीवानिशी मारायलाही पुढे मागे न बघणारा माणूस म्हणजे अप्पासाहेब! त्यांनी भेटायला बोलावणं म्हणजे सामान्य माणसासाठी धोक्याची मोठी घंटा! घाबरत घाबरत तिचे वडील त्यांना भेटायला गेले आणि मान खाली घालून घरी आले. घरी आल्यावर दोन तीन तांबे पाणी घटघट पिऊन सोप्यात येऊन अस्वस्थपणे येरझरे घालू लागले.
"मी काय म्हणते! काय झालंय? तुमच्याकडून काही चुकलंय का?" त्यांची पत्नी सुलोचना त्यांना विचारू लागली.
"हो! काळजाचा तुकडा तुझ्या पोटी जन्माला घातला हीच काय ती माझी चूक!" ते मुठी आवळून रागारागाने येरझऱ्या घालत होते.
"काय झालं? असं वागू नये! नीट बोलाल का माझ्याशी?" सुलोचना
"उदयसिंह धनावडेंना लग्न करायचंय आपल्या कोमुशी!" आण्णा
"अहो अजून लहान आहे ती. आणि ते क्षत्रिय आहेत! त्यांना ब्राम्हणाच्या लेकी केव्हापासून चालायला लागल्या?" सुलोचना काकींनाही थोडा राग आलाच!
"ते आता महत्त्वाचं नाही! माझ्या पिलाला कुठे लपवू ह्याची चिंता आहे मला!" आण्णा
"आण्णा आम्हाला ठाऊक होतं तू हरामखोर आहेस. बोलाव सूनबाईंना! आम्ही अंगठ्या घेऊन आलो आहोत! आज साखरपुडा उरकून टाकायचा आहे!" अप्पांचा भारदस्त आवाज घरभर घुमला. त्यांच्यासोबत उदयसिंह आणि परशा होते. परशा म्हणजे त्यांचा खानदानी अंगरक्षक अगदी बाहुबलीतल्या कटप्पासारखा! त्याच्या नजरेच्या कटाक्षानेही समोरचा गारद व्हावा असा राक्षसच! पर्याय नव्हता अण्णांना त्यांचं लाडकं पिलू जिवंत रहायला हवं होतं. नाईलाजास्तव त्यांना सगळं ऐकावं लागलं आणि कोमलची गाठ शेवटी उदयसिंहाबरोबर बांधली गेली. अण्णाच्या सात पिढ्यांनी पहिला नव्हता आणि पुढच्या सात पिढ्याही पाहू शकणार नाहीत एवढा दिमाखदार विवाहसोहळा त्यांच्या लेकीचा झाला पण कन्यादान करताना तिच्या चितेला अग्नी देत असल्याचा भास अण्णा आणि सुलोचना काकूंना झाला. कोमलही अवखळ असली तरी समजूतदार होती. आपल्या बापाची हतबलता तिने जाणली होती आणि आपल्या मनात जन्म घेऊ लागलेला प्रेमाचा अंकुर जाळून टाकत तिने उदयसिंहासोबत सात जन्मांसाठी स्वतःला बांधून घेतले फक्त आपल्या बापासाठी! आणि तेव्हापासून ती या सोन्याच्या पिंजऱ्यात तडफडत आपल्या मरणाची वाट पाहत होती. रोज शरीराबरोबरच मनावर होणारे बलात्कार सहन करत होती. तिच्या कॉलेजातील सगळ्यात हुशार मुलगा ज्याने तिचं काळीज कायमचं चोरलं होतं निशांत वाडेकर! अकरावीपर्यंत तो तिच्याच वर्गात होता. बारावीत तो पुण्याला शिकायला गेला तो थेट डॉक्टर होऊनच परतला. त्याला तिच्या मनातलं काही सांगण्याआधीच सगळ्या गोष्टी इतक्या भराभर घडल्या की जणू हेच आपलं नशीब हे मान्य करण्यावाचून तिला पर्याय उरला नाही अन तिने तिचं प्रेम तिने भूतकाळाच्या स्मशानात गाडून टाकलं.
हे सगळे विचार रोजच तिच्या डोक्यात भिरभिरत असत. पण हा म्हणजे जणू काही तिचा दिनक्रम झाला होता आता! उदयसिंहाची बाहेरख्याली तर लग्नाआधीपासूनच जगप्रसिद्ध होती. लग्नानंतर दोन आठवड्यातच तो तिला कंटाळला पण तिला तक्रार करण्याचीही मुभा नव्हती. फक्त स्वतःचे पौरुषत्व जगजाहीर करण्यासाठी त्याने एक अपत्य ठेवले. देवही ज्याचे त्याला योग्य फळ देत असतो. उदयसिंहाच्या पदरातही त्याने अगदी कोमलसारखीच गोंडस मुलगी टाकली होती. पण या सगळ्यात भरडली जात होती ती कोमल!
अचानक एके दिवशी तिची मैत्रीण आयेशाचा तिला मेसेज आला. 'निशांत लंडनहून परत आलाय!' अन् सुकून वाळवंट झालेल्या तिच्या मनात आशेची पालवी फुटली. पण आपलं लग्न झालंय आणि आता आपल्या पदरात एक गोंडस मुलगी आहे हे आठवतच तिने ती पालवी स्वतःच खुडून टाकली.
निशांत वाडेकर म्हणजे तालुक्याचे आमदार भाऊ पाटलांचे खास आबा वाडेकरांचा मुलगा. आण्णांएवढंच किंबहुना त्यांच्याहूनही अधिक वजनदार व्यक्तिमत्त्व! पण एकदम साधेसुधे सरळमार्गी! आबांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ मानली जायची. त्यानी कधी कुणाला काडीचाही त्रास दिला नव्हता. निशांतही अगदी आपल्या वाडीलांवरच गेला होता. शेवटी खाण तशी माती! राजकारणात त्यांच्या नावाला इतकं वजन होतं की गावातल्या राजकारणात ज्याला टिकायचं असेल त्याला आबांना धरूनच रहावं लागे. आप्पाही याला अपवाद नव्हते. इच्छा नसूनही आप्पांना आबांशी गोड रहावं लागे.
एक दिवस अशीच झोपाळ्यावर बसलेली असतानाच तिला समोरून एक उंची गाडी गेटमधून आत शिरताना दिसली. ती घाईघाईने मागच्या दाराने घरात गेली व आपल्या रूममध्ये जाऊन बसली. बाहेरचे लोक आले की घरातल्या बायकांनी समोर यायचं नाही असा धनावडेंच्या घरचा नियमच होता. तिच्या रूममधून दिवाणखाण्यातली बैठक स्पष्ट दिसत असे. खास उदयसिंहांसाठी तशी रचना केलेली होती. काही सेकंदातच उदयसिंह आप्पा आणि निशांत! हो निशांतच होता तो! तिघे आत आले आणि बैठकीच्या ठिकाणी बसले. तिचा स्वतःवर विश्वासच बसेना. चक्क तिचं पाहिलं आणि अर्थात शेवटचं प्रेम तिच्या नवऱ्यासोबत आणि सासऱ्यासोबत गप्पा मारत तिच्याच घरात बसलं होतं. त्याला ओळखण्यात तिच्याकडून चूक होणं शक्यच नव्हतं! हो तो निशांतच होता. बराच वेळ गप्पा मारून तो निघून गेला. रात्री उशीरपर्यंत तिच्या डोक्यात निशांत घुमत राहिला. उदयसिंह आल्यावर तिने हिम्मत करून विचारलं.
"अहो एक विचारू का?"
"काय?" उदय
"ते निशांत वाडेकर होते ना? सकाळी आलेले?" ती
"हो. तुला काय करायचंय! आणि तू कशी ओळखतेस त्या हरामखोराला?" उदय. त्याचं प्रश्नवजा उत्तर ऐकून त्याच्या कानाखाली आवाज काढावा असं तिला वाटलं.
"आम्ही एका वर्गात होतो." तिने स्वतःला सावरत उत्तर दिलं
"म्हणजे तोही ओळखत असेल तुला!" उदय
"माहित नाही. अभ्यासू होता तो. मुलींकडे फारसं लक्ष नसायचं त्याचं!" ती
"तो मोठं हॉस्पिटल टाकतोय गावात हायवेला! करोडोने पैसा ओतणार आहे. आपली जमीन आहे वाडीजवळ, तिथे हॉस्पिटल करून आपल्याला पार्टनर करून घ्यावं अशी अप्पांची इच्छा आहे. पण तो हरामखोर मानायलाच तयार नाही!" उदय जणू स्वतःशीच बडबडत होता.
"तुम्ही शांततेत घ्या. तो ऐकेल. शांत स्वभाव आहे त्याचा! सगळ्यांना मदत करायचा तो!" कोमल
"तेच तर! झाटू साला! समाजसेवेचे डोहाळे लागलेत त्याला. पैसा नाही कमवायचा म्हणे! लोकांना मदत करायचीय डॉक्टरसाहेबांना!" उदयचा पार चढू लागला.
"गैर काय आहे? आपल्याकडे पैशाची कमी आहे का? लोकांना थोडं दिलं म्हणून काय बिघडतं?" कोमल
"ते काय देतात आपल्याला? एका मताचे पाच पाच हजार मोजून घेतात माकडं!" उदय
तिने त्याच्याशी वाद घालायचं टाळलं. त्याच्या डोक्यात अचानक काहीतरी चमकलं आणि त्याने तिला विचारलं, "तू बोलशील का त्याच्याशी एकदा? आपल्या पार्टनरशिपसाठी?"
"मी?" तिच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का होता.
"हो हो तूच!" तो
"मला काय कळतं त्यातलं?" ती
"कळायचं काय त्यात. मी सांगेल तेवढं करायचं फक्त!" तो
"नको! मामंजी मारून टाकतील मला!" कोमल
"मी सांगतो त्यांना! हा प्रोजेक्ट हातचा जाता काम नये" उदय
"तुमचं तुम्ही ठरवा!" असं म्हणत तिने पांघरून घेतलं आणि झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा नेहमीप्रमाणे दिनक्रम चालू झाला. तिला पुन्हा आयेशाचा मेसेज आला.' निशांत तुझ्याबद्दल विचारत होता. मी काही बोलले नाही. काय करू?' पाषाणात फुटणारा पिंपळ कितीही वेळा खुडला तरी तो दुप्पट वेगाने पुन्हा फूटतोच. तिने रिप्लाय केला ' नको सांगूस काही!'
आयेशा: त्याचं पण लग्न झालं दोन वर्षांपूर्वी.
कोमल: छान! कुठली आहे मुलगी?
आयेशा: सातारची आहे. पाटील!!
कोमल: काय? त्याने इंटरकास्ट केलं?
आयेशा: जसं काय तू जातीतच केलंस
कोमल: माझं वेगळं आहे. तुला माहिती नाही का?
आयेशा: अजूनही तेवढाच गोड दिसतो गं तो. काल पाहिलं गावात
कोमल: मला का सांगतोयस पण तू?
आयेशा: त्याच्यावर एकेकाळी जीव ओवळून टाकलायस तू. मला माहित नाही का ते?
कोमल: शांत बस! ( ती रिप्लाय केला की आधीचा मसेज डिलिट करून टाकत होती)
आयेशा: त्या उद्यापेक्षा शंभरपट चांगला आहे तो.
कोमल: सांभाळून! माझ्या नवऱ्याबद्दल बोलतेस तू!
आयेशा: सॉरी!
आयेशाने तिला निशांतचा नंबर पाठवला आणि ती ऑफलाईन झाली.
कोमलचं मन ढवळून निघालं. त्याचा नंबर तिने निशा म्हणून सेव्ह केला. दिवसभर तिला अनेकदा त्याला मेसेज करायची इच्छा अनावर झाली पण तिने स्वतःला थांबवलं. रोजप्रमाणे एकटीच संध्याकाळचं जेवण करून ती खोलीत आली आणि उदयला फोन लावला.
"मी येणार नाही आज. काम आहे!"पलीकडून आवाज आला आणि फोन कट झाला. तिच्या अपेक्षांना काही किंमतच नव्हती. खरं तर तिलाच काही किंमत नव्हती. शेवटी हिंमत करून तिने निशांतला मेसेज केला
'हाय!'
निशांत: कोण?
कोमल: कोमल! कोमल आपटे
निशांत: हे हाय! कशी आहेस तू? नंबर कुठून मिळवलास?
कोमल: नशिबात होता मिळाला. मी मजेत आहे. तू कसा आहेस?
निशांत: मी ही मजेत! कुठे असतेस तू सध्या? कॉलेज झालं की व्हाट्सऍप फेसबुक सगळीकडून गायब झालीस अचानक
कोमल: इथेच आहे! आता मी मिसेस उदयसिंह धनावडे आहे.
निशांत: ओह माय गॉड! सरप्राईज! इंटरकास्ट? मी आलो होतो काल तुमच्या घरी.
कोमल: हो पाहिलं मी तुला.
निशांत: कधी भेटूयात मग?
कोमल: नको. मला परवानगी नाही. तुला माहिती आहे धनावडेंचा घरंदजपणा अँड ऑल!
निशांत: ओके ओके! बोल अजून काय म्हणतेस?
कोमल: काही नाही. खूप वर्षं झाली तुझा आवाज ऐकला नाही म्हणून... (पुढे काय लिहावं तिला कळेना)
निशांत: वेट आय विल कॉल यु
कोमल: नको! उदयने ट्राय केला तर मोठा गोंधळ होईल.
निशांत: देवा! कधी बदलणार आपले लोक? आय विल कॉल यु ऑनलाइन म्हणजे लाईन बिझी येणार नाही.
निशांतने तिला नेटकॉल केला.
कोमल: हॅलो
निशांत: हं बोल आता.
कोमल: किती बदललाय तुझा आवाज.
निशांत: तुझाही!
कोमल: बाय द वे काँग्रेट्स!
निशांत: कशाबद्दल?
कोमल: मिसेस पाटील-वाडेकरांबद्दल
निशांत: हाहाहा! थँक्स थँक्स!
कोमल: ठेऊ आता?
निशांत: ठीक आहे
खरं तर त्याला तिचं वागणं विचित्र वाटलं पण त्याने जास्त विचार केला नाही! त्याचा आवाज ऐकल्यानंतर तिला सगळे जुने दिवस आठवले. मैत्रिणी आणि शिक्षकांच्या नजरा चुकवीत चोरून चोरून त्याच्याकडे पाहणं, त्याच्या नावानं असंख्य प्रेमपत्रं लिहीणं आणि त्यातलं एकही त्याला न देणं! वर्गात त्याच्या बाकाशेजारच्या बाकावर बसायला मिळावं म्हणून रोज वर्गातल्या मुलींशी भांडणं! त्या मोरपिशी दिवसांच्या आठवणींनी सुद्धा तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. एका क्षणासाठी तिला वाटलं सगळं झुगारून द्यावं पण दुसऱ्याच क्षणी आपण किती हतबल आहोत याची जाणीव तिला झाली. पण तिचं मनही तेवढंच हट्टी होतं. ती जेवढं आवळून त्याला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत होती तेवढंच ते हिसके मारून मारून बंध तोडत सुसाट उधळत होतं. तिने पुन्हा त्याला मेसेज केला
कोमल: काय नाव आहे रे तुझ्या बायकोचं?
निशांत: नीलम!
कोमल: डॉक्टरच असेल ना?
निशांत: हो. मेडिकलची क्लासमेट आहे. सध्या गेली आहे माहेरी दोन महिन्यांनी डेट आहे
कोमल: अरे वा! अभिनंदन!! (खरं तर तिचं काळीज पिळवटून निघत होतं. असं वाटत होतं की तिचे श्वास कुणीतरी हिरावून घेऊन दुसऱ्या कुणाला तरी दिले आहेत.)
निशांत: धन्यवाद! बाकी काय आणखी? तुम्ही तर आता आख्या गावच्या महाराणी झालात! मजा असेल!
कोमल: हो ना! पण या काटेरी मुकुटाचं दुःख इतरांना नाही कळायचं! (तिच्या मर्मावरच त्यानं बोट ठेवलं होतं)
निशांत: हं! प्रत्येक गोष्टीची किंमत मोजवीच लागते. शेवटी या जगात फुकट काय मिळतं!
कोमल: आणि मला जे नको होतं त्याची किंमत मला मोजावी लागतेय!
निशांत: तू ठीक आहेस ना? काही प्रोब्लेम तर नाही ना?
कोमल: नाही रे! याला प्रॉब्लेम कसं म्हणू? हेच तर आयुष्य होऊन बसलंय माझं.
निशांत: मला भेटायचं आहे तुला. एकदा
कोमल: उशीर झालाय आता.
निशांत: म्हणजे?? (तिच्या मनातल्या कल्लोळाचा त्याला मागमूसही नव्हता)
कोमल: अरे रात्र खूप झालीय. झोपते आता.( तिने कसंबसं स्वतःला सावरलं.
निशांत: ओके! गुड नाईट!
कोमल: गुड नाईट!